शिवसेनेने मराठी माणसांच्या नावाने राजकारण केले. तीच शिवसेना आज मराठी माणसांच्या मुळावर उठली आहे. पावसाळा जवळ आला असताना बोगदा चाळीच्या रहिवाशांना निर्दयपणे घराबाहेर काढले आहे. त्यांना पावसाळयापूर्वी घरे मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करीन.
तुमचा प्रश्न सुटेपर्यंत मी तुमच्यासोबत असेन, असे ठाम आश्वासन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी बोगदा चाळ रहिवाशांना दिले. राणे यांच्या हस्ते सरबत घेऊन रहिवाशांनी गुरुवारी उपोषण सोडले.
परळ येथील बोगदा चाळीतील रहिवाशांना मुंबई महापालिका व विकासकाने जबरदस्तीने घराबाहेर काढले आहे.
रहिवाशांचा विरोध डावलून पुण्यातील काळ्या यादीत टाकलेल्या रामेश्वर सांबरी या बिल्डरला जबरदस्तीने हा गृहप्रकल्प देण्याचा डाव गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर आणि उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांनी आखला आहे. त्याविरोधात बोगदा चाळ येथील रहिवासी आझाद मैदान येथे लाक्षणिक उपोषणाला बसले आहेत. याबाबतची माहिती मिळताच माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी रहिवाशांची भेट घेतली. तुमचा प्रश्न सुटेपर्यंत मी तुमच्या पाठीशी राहीन, असे ठाम आश्वासन राणे यांनी दिल्यानंतर रहिवाशांनी उपोषण सोडले.
राणे म्हणाले की, बोगदा चाळीच्या प्रश्नासंदर्भात मी संपूर्ण माहिती घेतली आहे. आपण इथे उपोषणाला बसल्याचे कळताच मी स्वत: भेटायला येण्याचा निर्णय घेतला. वृद्ध, महिलांना कशा प्रकारे निर्दयीपणे बाहेर काढले याची माहिती आपण मला दिलीत. मी उद्याच तुमचा प्रश्न सोडविण्याबाबत मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांच्याशी चर्चा करणार आहे. त्याची माहिती तुम्हाला मी उद्या देईन.
पावसाळयापूर्वी तुम्हाला घर मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करीन. हा प्रश्न पूर्णपणे सुटेपर्यंत मी तुमच्यासोबत असेन, असे राणे यांनी सांगितले. राणे यांच्या ठाम आश्वासनानंतर रहिवाशांनी टाळया वाजवून त्यांचे स्वागत केले. त्यानंतर राणे यांच्या हस्ते उपोषणकर्त्यांना सरबत देऊन त्यांचे उपोषण सोडण्यात आले.