पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अपप्रचार केल्याचा आणि त्यांच्या सरकारच्या कार्यक्रम, धोरणांबद्दल प्रश्न उपस्थित केल्याचा ठपका ठेऊन आयआयटी मद्रासने आंबेडकर पेरियार विद्यार्थी मंडळावर बंदीची एकतर्फी कारवाई केली आहे.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाला आंबेडकर पेरियार विद्यार्थी मंडळ आयआयटी मद्रास कॅम्पसमध्ये एससी आणि एसटी विद्यार्थ्यांना जमवून मोदी आणि सरकारविरोधी कार्यक्रम राबवत असल्याची तक्रार मिळाली होती. अज्ञात व्यक्तीने ही तक्रार दाखल केली होती.
तक्रारदाराने पुरावा म्हणून मोदी सरकारच्या निर्णयांवर प्रश्न उपस्थित करणारे एपीएससीने प्रसिध्द केलेले एक पत्रकही जोडले होते. हिंदी भाषेचा वापर आणि गोवंश हत्याबंदी संदर्भात एपीएससीने काही प्रश्न उपस्थित केले होते.
मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या सचिव प्रिस्का मॅथ्यू यांनी १५ मे रोजी आयआयटी मद्रासच्या संचलाकांना एक पत्र पाठवले. या पत्रात त्यांनी आंबेडकर पेरियार विद्यार्थी मंडळा विरोधात अज्ञात व्यक्तीने पत्राव्दारे केलेल्या तक्रारीची माहिती दिली. यात सरकारविरोधी प्रसिध्द केलेल्या पत्रकाचाही उल्लेख होता. यासंबंधी लवकरात लवकर चौकशी करुन त्यांनी संस्थेला आपले मत कळवण्यास सांगितले होते.
त्यानंतर २४ मे रोजी आयआयटी मद्रासचे अधिष्ठाता शिवाकुमार.एम.श्रीनिवासन यांनी आंबेडकर पेरियार विद्यार्थी मंडळाच्या समन्वयकांना संघटनेची मान्यता रद्द करत असल्याचा मेल पाठवला. ते अज्ञात पत्र आयआयटी मद्रासमधील बहुसंख्य विद्यार्थ्यांचे प्रतिनिधीत्व कसे करु शकते असा सवाल एपीएससीने उपस्थित केला आहे. आम्हाला आमची बाजू मांडायची संधी न देता आयआयटी मद्रासने घेतलेला हा निर्णय पूर्णपणे एकतर्फी आहे असे एपीएससीने म्हटले आहे.
आमच्याकडून अचारसंहितेचे उल्लंघन झाले असून, आम्ही वादग्रस्त कार्यक्रमांमध्ये सहभागी असल्याचे आम्हाला डीनकडून सांगण्यात आले. संस्थेकडून मिळालेल्या अधिकाराचे आम्ही कुठेही उल्लंघन केलेले नाही असे एपीएससीच्या एका सदस्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.