अनारसे
पद्धत – १
अनारसे हा पदार्थ कधीही घाईत केला जाऊ नये. त्याकरिता तीन दिवस अगोदर तांदूळ भिजत घालावे व त्याची पिठी करावी. त्यानंतर त्यात वजनाने बरोबरीने गूळ व गरजेपुरते तूप मिसळून एकत्र कुटावे. त्याचा कणकेसारखा घट्ट गोळा करावा. हा गोळा जमल्यास आठ-दहा दिवस मुरला तरी चालतो. अनारसे करताना भिजलेल्या पिठाच्या गोळ्या करून खसखसीच्या साहाय्याने थापाव्यात. तळताना तूप प्रथम तापवून घ्यावे. चुकूनही गार तूप नको. अनारसे गुलाबी रंगाचे झाले पाहिजेत. आमच्या लहानपणी दिवाळीचे अनारसे करताना आम्हा भाडंवांना आई म्हणायची; ‘तुम्ही थोडा वेळ बाहेर थांबा. चुकून तुमची दृष्ट लागेल आणि अनारसे खराब होतील’ असो.
पद्धत – २
साहित्य- पाव कि. तांदूळ, पाव कि. गूळ, साजूक तूप, खसखस, तळणीसाठी रिफाइंड तेल.
कृती- शक्यतो जुने तांदूळ घेऊन ते ३ दिवस भिजत ठेवावे. रोज त्यातील पाणी बदलावे. नंतर ते धुवून, थोडे कोरडे करून मिक्सरमधून पीठ करून घ्यावे. पीठ पीटाच्या चाळणीने चाळून घ्यावे. पीठ किंचित ओलसर व हाताला गार लागते. नंतर त्यात गूळ घालावा. आवडीनुसार गुळाऐवजी साखर किंवा दोन्ही निम्मे निम्मे घातले तरी चालेल. दोन वाटय़ा पीठ असेल तर खायचे चार चमचे तूप त्यात घालावे. मिश्रण एकजीव करून चांगले कुटावे. गोळे करून डब्यात भरून ठेवावे. आठ-दहा दिवसांनी पीठ अनरसे करावयासाठी तयार होते. प्रत्यक्ष अनरसे करताना पीठ जास्त कोरडे वाटल्यास थोडे केळे त्यात कालवून घ्यावे. पीठ मळून पुरीसाठी घेतो तसा गोळा करून घेऊन एका प्लास्टिकच्या पिशवीला तूप लावून त्यावर तो थापावा व ती जाड पुरी खसखशीत घोळून घेऊन गरम तेलात अनरसा तळून घ्यावा. खसखस लावलेली बाजू तळताना वर ठेवावी व त्यावर झाऱ्याने तेल उडवून मंद आचेवर तळावा. तळताना तो उलटू नये. नंतर गार झाल्यावर घट्ट झाकणाच्या डब्यात बंद करून ठेवा.