स्मार्ट मीटर प्रणालीवरून वीज ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण असताना या विरोधात ठाणे जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वागळे इस्टेट येथील महावितरण कार्यालयावर बुधवारी धडक दिली. यावेळी दुपारी झोपेत असताना महावितरण अधिकाऱ्यांकडून गुपचूप स्मार्ट मीटर बसवले जात असल्याचा प्रकार शहरात अनेक उघडकीस आला आहे, असा आरोप मनसेचे नेते व ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केला. स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीजबिलात भरमसाठ वाढ होत असून सर्वसामान्य ग्राहकांची आर्थिक लूट थांबवा अशी मागणी महावितरण अधिकाऱ्यांना निवदेनाद्वारे करण्यात आली.
राज्यासह ठाण्यात स्मार्ट मिटरला नागरिकांचा विरोध आहे. ज्या घरगुती ग्राहकांकडे स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत, त्यांच्या वीजबिलात अचानक वाढ झाली असल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून केल्या जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयात ग्राहकांच्या तक्रारी वाढत असल्याने मनसेने वागळे इस्टेट येथील महावितरण कार्यालयासमोर निदर्शने केली.
