पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधून भारतात घुसण्यासाठी ३०० दहशतवादी तयारी आहेत, अशी माहिती लष्करी सूत्रांनी दिली. काश्मीरमध्ये अतिथंड असा हिवाळा सुरू होण्यापूर्वी भारतात घुसण्यासाठी त्यांच्यावर दबाव आहे.
लष्कराच्या उत्तर विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल एस. के. दुआ म्हणाले की, हिवाळा सुरू होण्यापूर्वी भारतात घुसण्यासाठी दहशतवाद्यांवर दबाव आणला जात आहे. त्यासाठीच गुरेझ भागात सोमवारी शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. यात भारताचे दोन जवान शहीद झाले.
काश्मीर खो-यातील सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी जनरल दुआ यांच्यावर आहे. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या बाहेर ३०० हून अधिक दहशतवादी भारतात घुसण्याच्या प्रयत्नात आहेत. हे दहशतवादी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून गोळीबार करून परत जातात, असे त्यांनी सांगितले.
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून भारतात घुसखोरीचे प्रयत्न कमी झाले आहेत. कारण भारताने घुसखोरीविरोधी यंत्रणा अधिक सक्षम केली.
गुरेझ येथे शस्त्रसंधी उल्लंघन हे पारंपरिक मार्गाने झाले नाही, त्यावर ते म्हणाले की, दहशतवाद्यांनी कदाचित आपला प्लॅन बदलला असावा. आम्ही गुप्तचर यंत्रणांशी समन्वय साधून आहोत. आम्ही कोणतेही आव्हान स्वीकारला तयार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.