मेळघाटातील चिखलदरा तालुक्याच्या डोमा शासकीय निवासी आश्रमशाळेतील काही विद्यार्थिनींमध्ये विचित्र आणि भीतीदायक लक्षणे दिसून आली. हा भुताटकीचा प्रकार असल्याची अफवा पसरल्याने भीतीपोटी पालकांनी आपल्या मुला-मुलींना आश्रमशाळेतून घरी परत नेण्यास सुरुवात केली. शुक्रवारी पटसंख्येवरील सर्व ६०८ विद्यार्थी शाळा सोडून निघून गेले होते.
डोमा येथील या आश्रमशाळेत २६३ मुले आणि ३४५ मुली निवासी शिक्षण घेतात. काही दिवसांपूर्वी एका विद्यार्थिनीमध्ये अकारण रडणे, मोठ्याने हसणे, अचानक ओरडणे, शांत बसून राहणे आणि कोणत्याही गोष्टीला प्रतिसाद न देणे अशी लक्षणे दिसून आली. पाहता पाहता हीच लक्षणे इतर मुलींमध्येही वेगाने पसरली. अमरावतीहून विशेष समुपदेशन पथक पाचारण करण्यात आले. मात्र, या विचित्र वर्तनामागील मूळ कारण शोधण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले नाही. काटकुंभ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अंकित राठोड यांच्या मते, हा प्रकार ‘मास हिस्टेरिया’ म्हणजेच तीव्र मानसिक तणावाशी संबंधित असल्याची शक्यता आहे.
शाळा व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे आणि आरोग्य यंत्रणेच्या अस्पष्ट भूमिकेमुळे पालकांचा शासकीय यंत्रणेवरील विश्वास उडाला आहे. आता केवळ अफवांवर नियंत्रण मिळवून भागणार नाही, तर या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी मुख्याध्यापक व अधीक्षकांवर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
या संपूर्ण घटनेत सर्वांत धक्कादायक बाब म्हणजे आश्रमशाळेची जबाबदारी असलेल्या मुख्याध्यापक आणि अधीक्षकांनी धारण केलेले मौन ठरले आहे. आश्रमशाळेत एकामागून एक गंभीर घटना घडत असताना आणि मुले शाळा सोडून जात असतानाही जबाबदार अधिकारी गप्प राहिले आहेत. यामुळे या प्रकारामागे काही प्रशासकीय हलगर्जीपणा किंवा अन्य काही गंभीर कारण तर नाही ना, असा संशय व्यक्त केला जात आहे.
