‘पश्चिम उपनगरात दहिसरमध्ये राहणाऱ्या उपमहापौरांना दररोज मुंबई महापालिकेत विविध बैठकांसाठी येताना प्रचंड वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. यामुळे मुंबई शहर भागातील अतिरिक्त आयुक्तांचा बंगला मिळावा’, अशी मागणी उपमहापौर संजय घाडी यांनी केली होती. महापौर रितू तावडे यांनी या मागणीला पाठिंबा दिला आहे.
विरोधकांचा आक्षेप
भायखळ्यातील राणी बागेला लागूनच महापौरांचा बंगला आहे. त्याशेजारीच महापालिका अतिरिक्त आयुक्तांचे सेवानिवासस्थान असलेला बंगला आहे. तो मिळवण्यासाठी उपमहापौर संजय घाडी यांनी महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना पत्रही दिले आहे. त्यांच्या या मागणीला विरोधकांनी आक्षेप घेतला आहे.
जल अभियंता विभागाचे रिकामे बंगले द्या’
‘उपमहापौरपद हे वैधानिक पद नाही. त्यांना बंगला मिळाल्यास विरोधी पक्षनेत्यांनाही बंगला मिळायला हवा’, अशी मागणी किशोरी पेडणेकर यांनी केली आहे. मात्र, या वादात महापौर तावडे यांनी मात्र उपमहापौरांच्या मागणीला पाठिंबा दिला आहे. सभागृहात महापौर उपस्थित नसताना उपमहापौर सभा चालवतात. त्यामुळे त्यांना महापालिकेतर्फे निवासस्थान मिळायला हवे. महापालिकेच्या जल अभियंता विभागाचे अनेक बंगले रिकामे आहेत. यातील एक उपमहापौरांना देण्यास हरकत नसल्याचे महापौरांनी शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
उपमहापौरांच्या पत्रात काय?
‘दैनंदिन कामासाठी महापालिका मुख्यालयातील बैठका, महापालिका सभा, उपमहापौर कार्यालयात येणारे नागरिक, प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या भेटी आणि प्रशासकीय कार्यक्रमांना उपस्थित राहावे लागते, मात्र मी दहिसर पूर्व भागात वास्तव्यास असल्याने तिथून मुंबई महापालिका मुख्यालयाला दररोज वाहनाने ये-जा करताना वाहतूक कोंडीत माझा बराच वेळ वाया जातो. त्यामुळे महापालिका मुख्यालयात वेळेत पोहोचणे शक्य होत नसल्याने मुंबई महापालिकेच्या तत्कालीन अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांच्या बदलीमुळे रिकामा झालेला राणी बाग परिसरातील बंगला मला निवासस्थानाकरिता उपलब्ध व्हावा’ अशी मागणी संजय घाडी यांनी काही दिवसांपूर्वी पत्राद्वारे केली होती.
अधिनियमानुसार बंगला-गाडी शक्य नाही
दरम्यान, महापालिकेच्या अधिनियमात उपमहापौर या पदाला मंजुरी आहे. पण त्याला वैधानिक दर्जा नाही. त्यामुळे त्यांना महापौरांप्रमाणे महागडी गाडी, आलिशान दालन, सुरक्षारक्षक, बंगला, सेवेसाठी कर्मचारी देणे शक्य नसल्याचे महापालिकेतील सूत्रांनी सांगितले.
हॉटेलची झाडाझडती
एफडीएने राज्यभरात भेसळयुक्त खाद्यपदार्थ, बनावट सौंदर्य प्रसाधने, दूध व दुग्धजन्य पदार्थांची झाडाझडती सुरू केली आहे. महापालिकेकडूनही मुंबईतील हॉटेलांची झाडाझडती घेतली जाणार आहे. भेसळयुक्त खाद्यपदार्थ आढळल्यास संबंधित हॉटेलचा परवाना रद्द करण्यात येणार आहे, असे महापौरांनी सांगितले.
