‘अल्लाहने एका झटक्यात माझ्याकडून माझं सर्वस्व हिरावून घेतलं. माझ्याकडून काय कमी राहिलं होतं? माझी चारही मुलं आणि माझी बायको मला परत द्या…’ चाळीस वर्षांच्या मोईनुद्दीन वाजिदअली शाह यांच्या दु:खाला शब्द फुटले आणि त्यांच्या अश्रूंचा बांध फुटून ते धाय मोकलून रडू लागले. मानखुर्दच्या जनता नगर दुर्घटनेत मोईन यांची चार मुले आणि बायको असे सर्वच कुटुंबीय मृत्युमुखी पडले. दुपारपर्यंत सुन्न झालेल्या मोईन यांना त्यांच्या मित्राने मिठी मारताच त्यांच्या दु:खाचा बांध अनावर झाला.
मोईन यांच्या शेजारी राहणाऱ्या मेहर अली यांच्या चार वर्षांच्या मुलाला रविवारी सकाळीच घराला तडे गेल्याचे दिसले होते. त्याने ते त्याच्या आईला म्हणजे मेहर यांना त्याबाबत सांगितले. त्यानंतर त्यांच्या तीन मजली घरासह त्यांच्या आसपासच्या लोकांनीही आपापली घरे रिकामी केली. त्यात मोईनुद्दीनही होते. त्यांनी त्याच परिसरात दुसरे भाड्याचे घरही बघितले होते. ते सोमवारीच त्या घरात राहायला जाणार होते आणि म्हणून त्यांनी बाजूच्याच घरात तात्पुरता मुक्काम केला होता.
खायला आणण्यासाठी दुकानात गेले
रात्री आठच्या सुमारास त्यांच्या मुलांना भूक लागल्याने त्यांची पत्नी अख्तर जहाँ मोइनद्दीन शाह (३५) यांनी घरात जाऊन खिचडी बनविण्याचा निर्णय घेतला, तर मोईनुद्दीन मुलांना बाहेरून काहीतरी खायला आणण्यासाठी दुकानात गेले. यावेळी अख्तर जहाँ यांच्यासोबत कैसर जहाँ (१४), मुनाफ (७), जलाउद्दीन (६), अनाबिया (३) ही मुले सुद्धा घरी गेली. शेजारच्या घरातून खेळण्यासाठी ६ वर्षांची आलिया अल्लाउद्दीन शेख त्यांच्यासोबत गेली.
