असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मामृतं गमय… “मला असत्याकडून सत्याकडे, अंधाराकडून प्रकाशाकडे, मृत्यूकडून अमरत्वाकडे घेऊन जा” चेंबूरमधील रस्ता क्रमांक ११ वर रस्त्याच्या कडेला असलेले झाड शाळेच्या बसवर पडून मृत्यू पावलेल्या ११ वर्षीय विहान श्रीवास्तवच्या अंतिम प्रवासाला सुरुवात होत असताना, ज्ञानप्राप्ती आणि शांतीसाठीचा हा प्राचीन संस्कृत मंत्र निनादत होता. शोकाकुल श्रीवास्तव कुटुंबाचे मित्र आणि नातेवाईक त्यांच्याभोवती जमले होते, यावेळी अशा जीवघेण्या घटनांसाठी प्रशासकीय जबाबदारीच्या अभावाबद्दलचा संताप स्पष्टपणे जाणवत होता.
‘कुकरेजा हाईट्स’ येथील निवासस्थानापासून रुग्णवाहिकेपर्यंत अंत्ययात्रा निघाली. अल्ट्राटेक सिमेंटमध्ये अभियंता असलेले विहानचे वडील अत्यंत संयमाने पुढे चालत होते, त्याच वेळी विहानची आई, तसेच इतर नातेवाईक आणि शेजाऱ्यांच्या आक्रोशाने ती वसाहत दुमदुमून गेली होती.
लेकाची बॅट घट्ट धरुन बसलेली आई
अंत्यसंस्कारापूर्वी विहानची आई जुही श्रीवास्तव या शोकाकुल अवस्थेत घरी शांत बसल्या होत्या; त्या आपल्या मुलाची क्रिकेटची बॅट घट्ट धरून होत्या आणि त्यांच्या भोवती नातेवाईक व शेजारी जमले होते. त्यांची ती शांतता शब्दांत न मांडता येण्याजोग्या अतीव दुःखाची साक्ष देत होती.
पार्थिवाशेजारी क्रिकेटचा बॉल ठेवून निरोप
देवनार पाडा स्मशानभूमीत चितेला अग्नी देण्यापूर्वी काही क्षण आधी, कुटुंबीयांनी विहानच्या पार्थिवाशेजारी एक क्रिकेटचा चेंडू ठेवला. क्रिकेटची प्रचंड आवड असलेल्या मुलाला दिलेला हा अखेरचा निरोप होता.
आजोबा आठवणीत रमले
“मी त्याला बॅट बॉल आणून दिला होता. तो उत्तम खवय्याही होता” असे उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद येथील वकील असलेले त्याचे आजोबा एस एन श्रीवास्तव यांनी सांगितले. अभिमानाने सांगताना त्यांच्या डोळ्यांत पाणी दाटून आले. “तो हनुमान चालीसा जशीच्या तशी पूर्णपणे तोंडपाठ म्हणू शकत असे.”
या घटनेबाबत आपण तक्रार दाखल करणार असल्याचे श्रीवास्तव यांनी सांगितले. “मी तक्रार नक्कीच करेन, पण ती तक्रार कोणीतरी हाती घेतली पाहिजे आणि त्यावर योग्य ती कारवाई होईल याची खात्री केली पाहिजे” असे ते म्हणाले
आमचं बाळ आता परतणार नाही
“आमचं बाळ आता परत येऊ शकत नाही,” असे दिल्लीहून आलेले विहानचे चुलत आजोबा आणि लोकसभेचे निवृत्त अतिरिक्त सचिव अनिल श्रीवास्तव म्हणाले. “कोणतीही नुकसानभरपाई पुरेशी ठरणार नाही. आमचा विहान त्याच्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता, तो आता आमच्यात नाही. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नागरी कामांसाठी निधीची तरतूद केली जाते; त्याचा योग्य वापर व्हायला हवा. धोकादायक झाडे आणि उघड्या मॅनहोल्सबाबत काहीतरी ठोस उपाययोजना केल्या पाहिजेत, जेणेकरुन आम्हाला ज्या वेदनादायी परिस्थितीचा सामना करावा लागत आहे, तसा त्रास इतर कोणत्याही कुटुंबाला सहन करावा लागणार नाही.” असे ते पुढे म्हणाले.
अखेरीस, विहानच्या चितेचा धूर देवनारमधील स्मशानावरील राखाडी आकाशाच्या दिशेने वर जात असतानाच, वर असलेल्या एक्झॉस्ट यंत्रणेने त्यातील बराचसा धूर ओढून घेतला आणि मागे उरला तो केवळ पावसाचा ओला गंध. नातेवाईक आणि शेजारी अंतिम श्रद्धांजली वाहण्यासाठी रांगेने पुढे जात असताना कुटुंबातील सदस्य एकमेकांच्या आधाराने एकत्र उभे होते.
कुटुंबाचे शेजारी विनोद मल्होत्रा यांना विहानची आठवण झाली; अपघाताच्या काही दिवस आधीच त्यांची त्याच्याशी भेट झाली होती. “मी त्याला त्याचे वय विचारले, तेव्हा तो हसून म्हणाला, ‘अकरा.’ मी त्याला म्हणालो, ‘तू तर खूप उंच झाला आहेस.’ इतक्या कमी काळात त्याची झालेली वाढ पाहून मला आश्चर्यच वाटले. तो खूपच प्रेमळ आणि छान मुलगा होता” असे ते म्हणाले.
