‘वारीने जीवदान दिले, मोठ्या अपघातातून वाचवले. म्हणूनच आज आम्ही वारीत चालतो आहोत, एवढेच नव्हे तर, माझ्या पतीचे मागील तीस वर्षांपासून दारूचे व्यसन सुटले आहे, आणि माझे देखील मिस्त्रीचे (मशेरी) व्यसन सुटले. शरीर साथ देते तोपर्यंत वारीमध्ये चालण्याचे भाग्य आम्हाला मिळत राहो, एवढीच विठुरायाच्या चरणी प्रार्थना!”
तीस वर्षांपासून अखंडित नाशिक ते पंढरपूर वारी
गेल्या तीस वर्षांपासून अखंडित नाशिक ते पंढरपूर डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन वारी करणाऱ्या सुमनबाई यांनी आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली. संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांच्या पालखीचे शहरात आगमन झाले. यात दुपारी विश्रांतीच्या वेळी सुमनबाईंनी अनुभव कथन केले. सुमनबाईंचा परिवार हा सर्वसाधारण आर्थिक परिस्थितीतला. सुना-नातवंडे असा त्यांचा परिवार आहे. “आपल्या कुटुंबाकडून वारकऱ्यांना दोन घास अन्नदानाची जर मिळाली तर त्यामध्ये आम्हाला धन्यता वाटतेए” अशा भावना देखील सुमनबाईंनी व्यक्त केल्या. त्यांच्या मन मोकळ्या गप्पांमध्ये कोणतीही अपेक्षा पांडुरंगाच्या भक्तिमार्गाकडून नाही.
सुमनबाई अनेक गोष्टी बोलून गेल्या. संस्कृती, परंपरा, व्यसनमुक्ती अशा अनेक गोष्टी कोणतीही औपचारिक शिक्षण नसतानाही त्यांनी सांगितल्या. बऱ्याच वारकरी महिला वारीत भेटतात. त्या केवळ अशा तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन चालत नाहीत; तर एका समर्थ परंपरेच्या त्या पाईक आहेत, असा त्यांच्या बोलण्यातला मतितार्थ दिसून आला. संतांचे अभंग, गवळणी, हरिपाठ, आणि काही ओव्या तोंडपाठ असलेल्या या महिला संसारातील दुःखाने देखील पिडलेल्या आहेत; मात्र संसारिक दुःखाची कोणतीही तमा न बाळगता पंढरीच्या वाटेवर त्या निघाले आहेत.
वारीवरील श्रद्धा अधिक दृढ
पंढरपूर वारी करून परतत असताना सिन्नरजवळ वारकऱ्यांच्या वाहनाला काही वर्षांपूर्वी अपघात झाला. त्यातून सुमनबाईंसह इतरही वारकरी थोडक्यात बचावले. त्यामुळे वारीवर असणारी त्यांची श्रद्धा अधिकच दृढ झाली. आज वारीचा तिसरा दिवस आहे. या तीन दिवसांत सातत्याने पाऊस पडत आहे, तरी डोक्यावरची तुळशी वृंदावन जराही हलू न देता त्या खंडित चालत आहेत. संस्कृती आणि परंपरांचा असा अनोखा संदेश देत कुठल्याही बेगडी, झगमगासाठी, प्रचार प्रसारापासून दूर असणारे हे वारकरी खऱ्या अर्थाने संतांच्या वैचारिक मार्गावरून चालत आहेत. अर्थात वारकरी संप्रदायाची ही बलस्थाने आहेत.
निवृत्तिनाथ स्मरणे सुख शांती पावलो
दरम्यान, ‘निवृत्तिनाथ स्मरणे सुख शांती पावलो, निर्विकार स्वयंभू ज्योति प्रकाश पडिला…’ या आरतीतील भावानुसार संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांचा जयघोष करीत त्र्यंबकेश्वर रोडवरील पंचायत समितीच्या आवारात नाथांच्या पालखीचे प्रचंड उत्साहात स्वागत करण्यात आले. सातपूर ते नाशिक पंचायत समिती मार्गावर रेखाटलेल्या सुबक रांगोळ्या, टाळ-मृदंगाच्या ठेक्यावर माऊलींचा गजर करत आनंदविभोर होऊन फुगड्यांचा फेर धरलेले हजारो वारकरी, भर पावसातही डोईवर ठेवलेले तुळशीवृंदावन अन् अबीर गुलालाची उधळण करीत हरिनामाच्या गजराने संत निवृत्तिनाथांच्या पालखीने शहराचा आसमंत उजळून टाकला.
