पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्ह्याकडे मार्गस्थ होणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराज यांच्यासह विविध संतांच्या पालखी मुक्काम स्थळी वारकऱ्यांना विविध सोयीसुविधा उपलब्ध करण्यासाठी राज्याच्या ग्रामविकास विभागाने पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी तीन कोटी ३३ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हा निधी जिल्ह्यातील २२ ग्रामपंचायतींना वितरित करण्यात आला आहे.
जिल्हा परिषदेकडून मोठी मागणी होती
आषाढीवारी पालखी सोहळ्यासाठी पुणे जिल्ह्यातून श्री संत सोपान महाराज, श्री संत गोरा कुंभार महाराज, श्री संत निळोबाराय महाराज यांच्यासह अन्य संतांच्या पालखी मुक्काम स्थळी पालखी तळावरील जमिनीचे सपाटीकरण करणे, स्वच्छतागृहांची व्यवस्था करणे, पाण्याचे स्रोत शुद्धीकरण करणे, वीज व पाणी पुरवठा करणे, पालखी स्वागत व निरोप कक्ष उभारणे, वाहन व इंधनाची व्यवस्था करणे यासारख्या कामांसाठी अनुदान व इतर खर्चासाठी निधी उपलब्ध करण्याची मागणी जिल्हा परिषदेकडून करण्यात आली होती.
त्यानुसार, केंद्रीय निवडणूक आयोगाची ना हरकत घेऊन पुणे जिल्हा परिषदेला निधी देण्यास ग्रामविकास विभागाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. पुणे जिल्ह्यात विविध संतांच्या पालख्यांचे ३४ ठिकाणी मुक्काम होणार आहेत; तर ५८ ठिकाणी विसावा आणि नऊ ठिकाणी निवाराची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यानुसार पालख्यांच्या सोयीसुविधांच्या नियोजनाची जबाबदारी संबंधित ग्रामपंचायतींसह प्रशासनाची असेल.
