कोल्हापूरमधील होन्याली येथे एका टेम्पोने दुचाकीला धडक दिल्याने गुरुवारी मुंबईतील पवई भागात राहणारे तिशीतील जोडपे आणि त्यांची ७ व १० वर्षे वयाची दोन मुलं अशा चौघांचा मृत्यू झाला. धडकेची तीव्रता इतकी होती, की टेम्पो उलटला आणि त्याखाली बाईकस्वार चौघेही कुटुंबीय अडकले. दीपक चांदे (वय ३९), त्यांची पत्नी शोभा (वय ३५) आणि त्यांची मुले जय (वय १०) व पूर्वा (वय ७) अशी मृतांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दीपक आणि शोभा चांदे यांनी होन्याली येथे घर बांधले होते. मुलांच्या उन्हाळी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी सगळे तिथे गेले होते. ५ जून रोजी परतण्यापूर्वी सरपंचांच्या नातेवाईकांना भेटायला जात असताना हा अपघात घडला.
टेम्पोखाली चिरडल्याने चौघांचा मृत्यू
आजरा तालुक्यातील उत्तूर-बहिरवाडी मार्गावर त्यांच्या दुचाकीला एका टेम्पोने धडक दिली. त्यानंतर तो टेम्पो रस्त्याच्या कडेला असलेल्या ओढ्यात उलटला. त्याखाली दबले गेल्याने आई-वडील व दोन्ही मुलांचा मृत्यू झाला. अपघातानंतर टेम्पो चालक घटनास्थळावरून पळून गेला.
नव्या घरात सुट्ट्या घालवल्या
पवईचे रहिवासी असलेले चांदे कुटुंब उन्हाळी सुट्टीसाठी आठ दिवसांपूर्वीच होन्याली येथे आले होते, अशी माहिती गावच्या सरपंच स्मिता पाटील यांनी दिली. “मुंबईत अनेक वर्षे काम केल्यानंतर दीपक यांनी २०२५ मध्ये हे घर बांधले होते आणि घराच्या अंतर्गत सजावटीची व फिटिंग्जची उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी ते तिथे आले होते. नवीन बांधलेल्या घरात कुटुंबाचा हा पहिलाच दीर्घकालीन मुक्काम होता,” असे सरपंचांचे पती विनायक पाटील यांनी सांगितले.
