भिकाऱ्यांचे पुनर्वसन करण्यासाठी पोलिसांनी हाती घेतलेल्या एका नियमित मोहिमेला एक अनपेक्षित वळण मिळाले. रस्त्यावर राहणारा आणि काहीसा गोंधळलेल्या अवस्थेतील एक तरुण चक्क वैद्यकीय शिक्षण घेणारा विद्यार्थी असल्याचे निष्पन्न झाले. मानसिक आरोग्याच्या समस्येमुळे तो आपल्या कुटुंबापासून दुरावला होता. अधिक सखोल तपास करत असताना पोलिसांना या तरुणाच्या कुटुंबाचा शोध नांदेड येथे लागला. अखेरीस मालाड पोलीस ठाण्यात या कुटुंबाचे अत्यंत भावपूर्ण पुनर्मिलन झाले.
पोलिसांची हळूवार फुंकर
गुरुवारी मुंबई पोलिसांचे एक पथक मालाडच्या एस व्ही रोडवरुन भिकाऱ्यांना ताब्यात घेत होते. यावेळी कॉन्स्टेबल कोमलसिंग जाधव यांना विशीतील एक तरुण आढळला, ज्याला साध्या प्रश्नांची उत्तरे देता येत नव्हती किंवा सुसंगतपणे बोलताही येत नव्हते. तो संकटात असल्याचे ओळखून जाधव यांनी त्याला पोलीस ठाण्यात आणले आणि कोमट पाण्याने आंघोळ व गरम जेवण देऊन शांत केले. तो काहीसा सावरल्यानंतर, एका पोलीस उपनिरीक्षकाने त्याच्या भूतकाळाविषयी हळूवारपणे चौकशी करण्यास सुरुवात केली.
नांदेडमधील हरवल्याच्या तक्रारीतील वर्णन जुळले
मानसिक आघातामुळे निर्माण झालेला संभ्रम जसजसा दूर होऊ लागला, तसतसे या कोड्याचे सर्व तुकडे आपोआप जुळत गेले. त्या तरुणाने आपले नाव ‘अभय’ असल्याचे सांगितले आणि आपण नांदेड जिल्ह्यातील ‘तामसा’ येथील होमिओपॅथीच्या तिसऱ्या वर्षाचा विद्यार्थी असल्याचे स्पष्ट केले. या वर्षाच्या सुरुवातीला, रेल्वेने प्रवास करत असताना त्याची बॅग चोरीला गेली होती.
नंबर आठवेना
हातात कोणताही पैसा नसताना आणि आपल्या बॅगेत ठेवलेल्या कागदावर लिहिलेले कुटुंबाचे संपर्क तपशीलही उपलब्ध नसल्यामुळे, तो मुंबईत येऊन पोहोचला. आधीपासूनच असलेल्या मानसिक आजाराशी लढा देत असताना आणि कुटुंबाचा फोन क्रमांक आठवणे शक्य होत नसल्यामुळे, पोटापाण्यासाठी अभयला भीक मागण्याचा आधार घ्यावा लागला
