मुंबई, ठाणे आणि पुण्यातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या

महाराष्ट्र सरकारने राज्य पोलीस दलात मोठे फेरबदल केल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. अनेक वरिष्ठ आयपीएस आणि राज्य पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदोन्नतीचे आदेश दिले आहेत. या महाराष्ट्रातील मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, मीरा भाईंदर, वसई आणि विरारचा समावेश आहे. ग्रामीण आणि इतर जिल्ह्यांमध्येही गृह विभागाने नवीन नियुक्त्या केल्या आहेत.

मुंबई, ठाणे आणि पुण्यात मोठे फेरबदल 

मुंबई आणि ठाणे पोलीस आयुक्तालयांमध्येही राज्य सरकारने मोठे फेरबदल केले आहेत. शीला सैल यांना मुंबई शहराच्या पोलीस उपआयुक्तपदी नियुक्त केलं गेलं आहे. तर बाळासाहेब पाटील यांची मुंबईहून ठाणे शहरात बदली झाली आहे.

ठाण्याबद्दल सांगायचं झालं तर एस. एस. बुरसे यांची ठाणे शहरातून मुंबई येथील राज्य गुप्तचर विभागाच्या (एसआयडी) उपआयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. श्रीकांत परोपकारी यांच्याकडे किनारी सुरक्षा आणि सागरी सुरक्षा विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राज्य गुप्तचर विभागातून रवींद्र परदेशी यांना हटवून पुण्यातील एसआरपीएफ गट क्रमांक 1 च्या कमांडरपदी नियुक्त करण्यात आलंय.

34 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती?

नागपूरचे अतिरिक्त पोलीस आयुक्त शिवाजी राठोड हे आता ठाणे शहरात अतिरिक्त पोलीस आयुक्त असणार आहेत. एटीएस पुण्याचे डीआयजी प्रमोद शेवाळे यांच्यावर नवी मुंबई गुन्हे शाखेत अतिरिक्त पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

तसंच विनिता साहू यांची मुंबई राज्य राखीव पोलीस दलाच्या डीआयजीपदी जबाबदारी देण्यात आली आहे. मुंबई एसआरपीएफमधील अशोक दुधे आता ठाणे शहराच्या अतिरिक्त पोलीस आयुक्त असणार आहेत. तसंच वायरलेस कम्युनिकेशन्स विभागातील पोलीस अधीक्षक आर. राजा यांना मुंबईत वायरलेस कम्युनिकेशन्सचे अतिरिक्त पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक म्हणून प्रकाश जाधव यांची नियुक्ती झाली असून विनय राठोड यांची ठाणे ग्रामीणमध्ये बदली झाली आहे. तर कोल्हापूरमध्ये अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू यांची ठाणे शहरात पोलीस उपआयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. तर एसआरपीएफ गट 19, अहिल्यानगरमधील विमला एम. यांची नाशिक ग्रामीणमध्ये अतिरिक्त पोलीस अधीक्षक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. ठाणे शहरातील शशिकांत बोराटे यांची राज्य पोलीस नियंत्रण कक्षात बदली झाली.

पुणे सीआयडीचे संभाजी कदम यांची एटीएस पुणे येथे पोलीस अधीक्षक म्हणून बदली केली आहे.  अमरसिंग जाधव यांची ठाणे शहरातून राज्याच्या आपत्कालीन पोलीस सेवेशी संलग्न असलेल्या डायल-112 नवी मुंबई या पोलीस विभागात बदली केली आहे. तसंच समीर शेख यांना राज्य पोलीस नियंत्रण कक्षातून हटवून बीडचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक करण्यात आले आहे. तानाजी चिखले यांची डायल-112 वरून परभणी येथे बदली झाली आहे.

मीरा भायंदर-वसई विरार (एमबीव्हीव्ही) पोलीस आयुक्तालयातही अनेक फेरबदल करण्यात आले आहेत. संजय सरगुंडा पाटील यांची पिंपरी चिंचवडमधून एमबीव्हीव्ही येथे बदली झाली आहे. अमोल झेंडे यांची पीएमआरडीएमधून एमबीव्हीव्ही इथे पोलीस उपआयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे.

विक्रांत देशमुख यांची एमबीव्हीव्हीमधून पिंपरी चिंचवडमध्ये नियुक्ती झाली आहे. प्रीती टिपरे यांना एमबीव्हीव्हीमधून मुंबईत अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागात सहायक आयुक्त म्हणून बदली झाली आहे. तसंच मुंबई शहरातील हिम्मत जाधव यांची पुण्यात अमली पदार्थ आणि अंमली पदार्थ विरोधी कृती दलात अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. शिवाजी पवार यांची मुंबईतून पुण्यात महामार्ग वाहतूक पोलीस अधीक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. रमेश चोपडे यांची किनारी सुरक्षा विभागातून दौंड येथील नानविज येथील पोलीस प्रशिक्षण केंद्राची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

या अधिकाऱ्यांच्या बदल्या रद्द 

गृह विभागाने काही अधिकाऱ्यांच्या यापूर्वी काढलेल्या बदल्यांचे आदेशही रद्द केले आहेत. कुमार चिंथा यांची नागपूर शहरातील बदली रद्द झाली आहे. त्यासोबत नित्यानंद झा यांची यवतमाळ पोलीस अधीक्षक पदावरील बदलीही रद्द करण्यात आली आहे. नाशिक पोलीस अकादमीमधील अकबर पठाण यांची बदली मागे घेण्यात आली आहे. तर त्यांची मुंबई शहरात नियुक्ती केली गेली आहे. जात प्रमाणपत्र पडताळणी समितीवर पोलीस अधीक्षक म्हणून दीपक गिरहे यांची अमरावतीहून नाशिकला बदली झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *