सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील नागरे वस्ती परिसरातील बंधाऱ्यात बुडून महिला आणि तीन चिमुकल्यांचा करुण मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी चारच्या सुमारास घडली. यवतमाळ जिल्ह्यातून पुण्याकडे कामासाठी निघालेल्या मजूर कुटुंबावर या दुर्घटनेमुळे शोककळा पसरली आहे.
मृतांमध्ये मनीषा विजय रामजोशी (वय २८), तिचा मुलगा कार्तिक विजय राम जोशी (११), तसेच भाचे आदित्य राहुल शिंदे (७) आणि अविनाश राहुल शिंदे (८, सर्व रा. वडारपुरा, डिग्रस, जि. यवतमाळ) यांचा समावेश आहे.
डिग्रस येथील हे कुटुंब पुणे येथे नाली खोदकामाच्या कामासाठी निघाले होते. इतर नातेवाइकांची वाट पाहण्यासाठी त्यांनी दोन दिवसांपूर्वी नांदूरशिंगोटे परिसरात तात्पुरता मुक्काम केला होता. मुक्कामाच्या ठिकाणाजवळील नागरे बंधाऱ्यावर शनिवारी मनीषा रामजोशी कपडे धुण्यासाठी बंधाऱ्यावर गेल्या. सोबत कार्तिक, आदित्य आणि अविनाश हेही गेले होते.
