ठाणे शहरातील काही भागांमध्ये उद्या दुपारी 12 वाजता नळाचे पाणी जाणार आहे. दुपारच्या बारा वाजेपासून पुढचे 24 तास ठाण्यातील काही भागांमध्ये पाणी येणार नाही. यामुळे नागरिकांनी पाण्याचा साठा करुन ठेवण्याचा आणि पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर करण्याचं आवाहन ठाणे महापालिका प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. पाणी कपातीमागे दोन मुख्ये कारण असल्याचे कारण आहेत. यापैकी एक म्हणजे आगामी काळात पाऊस सरासरीपेक्षा काहीसा कमी होणार असल्याचा अंदाज आहे. या दरम्यान धरणातील पाणीसाठा याचा विचार करता हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी पाणी कपात केली जाणार आहे. नागरिकांनी याबाबत नोंद घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.
23 एप्रिल 2026 रोजी जलसंपदा विभागासमवेत पाणीपुरवठा अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीतील निर्णयानुसार सद्यस्थितीत आंध्रा आणि बारवी धरणातील पाण्याची तूट तसेच पुढील हंगामात पावसाचे कमी प्रमाण लक्षात घेता 31 ऑगस्ट 2026 पर्यंत पाणी वापराचे नियोजन करण्यासाठी महामंडळामार्फत पाणी कपात करण्याचे प्रस्तावित आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणी पुरवठा योजनेच्या अंतर्गत जांभूळ जलशुध्दीकरण केंद्रातील जलाशय येथे बारवी गुरूत्ववाहिनी क्र. 1,2 व 3 वर वाहिन्यांचे उन्नतीकरण व तातडीचे देखभाल दुरूस्तीचे काम करण्यात येणार आहे. परिणामी गुरूवार दिनांक 21 मे रोजी दुपारी 12.00 वाजल्यापासून ते शुक्रवार दिनांक 22 मे रोजी दुपारी 12.00 वाजेपर्यत एकूण 24 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा -मानपाडा आणि वागळे (काही भागात) प्रभागसमितीमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणीपुरवठा करण्यात येतो. सदर शटडाऊन कालावधीत ठाणे महानगरपालिके अंतर्गत दिवा, मुंब्रा (प्रभाग क्र. 26 व 31 चा काही भाग वगळता) आणि कळवा प्रभाग समितीमधील सर्व भागामध्ये व वागळे प्रभाग समिती मधील रुपादेवी पाडा, किसननगर नं. 2, नेहरुनगर तसेच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत खालचा गाव येथील पाणीपुरवठा 24 तासासाठी पूर्णपणे बंद राहणार आहे.
पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे. तरी सदर पाणी कपातीच्या कालावधीत पाण्याचा वापर काटकसरीने करावा असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.
