सणोत्सव आणि लग्नसराईच्या हंगामापूर्वी दागिने खरेदीदार, सराफा व्यापारी आणि अगदी घरगुती खरेदीच्या पद्धतींवर केंद्र सरकारच्या अलीकडच्या सोने आणि चांदीच्या परदेशातून होणाऱ्या आयातीवरील शुल्कात मोठी वाढ करण्याच्या निर्णयाचा सर्वाधिक परिणाम दिसून होऊ शकतो.
मध्यपूर्वेतील संघर्षाला नजीकच्या काळात तोडगा निघताना दिसत नसताना जागतिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर परकीय चलन साठ्यावरील दबाव कमी करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागरिकांना वर्षभर सोने खरेदी टाळण्याचे आवाहन केल्यानंतर काही दिवसांनी निर्णय घेण्यात आला आहे.
आयात शुल्क वाढीचा खरेदीदारांवर कसा परिणाम होणार?
परदेशातून होणाऱ्या मौल्यवान धातूंच्या आयातीवरील शुल्क वाढीचा सर्वात मोठा आणि तात्काळ परिणाम रिटेल पातळीवर सोन्याच्या किमती वाढण्यात होण्याची शक्यता आहे. सोन्याच्या आयातीवर आता 10% मूळ किंवा बेसिक शुल्क आकारला जाईल तर, 5 टक्के AIDC लागू होईल. अशाप्रकारे, एकूण 15 टक्के आयात शुल्क आकारले जाणार आहे.
अशाप्रकारे, भारतीय सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याची किंमत 15,475 रुपये प्रति ग्रॅम आहे तर चांदीचा भाव 2.96 रुपये किलो आहे.
| स्थिती | शुल्क दर | 1,54,750 रुपयांवरील शुल्क रक्कम | शुल्क लागू केल्यानंतरचे दर |
| पूर्वीची रचना | 6% | 9,285 रुपये | 1,64,035 रुपये |
| नवीन रचना | 15% | 23,212 रुपये | 1,77,962 रुपये |
आयात शुल्क वाढीचा ग्राहकांवर परिणाम
याशिवाय वरील दरांमध्ये जीएसटी, ज्वेलर्सचा नफा आणि घडणावळीचा खर्च जोडल्यानंतर शेवटची किंमत आणखी वाढू शकते. परिणामी नवीन दागिन्यांसाठी लक्षणीयरीत्या जास्त खर्च होऊ शकतो. हलक्या वजनाच्या दागिन्यांची दागिन्यांची मागणी वाढेल, नवीन सोने खरेदी करण्याऐवजी जुने दागिने बदलून घेण्याचा ट्रेंड कमबॅक करेल तसेच लोक डिजिटल गोल्ड किंवा गोल्ड ईटीएफकडे वळतील.
आयात शुल्क वाढीमुळे सोन्याची तस्करी वाढण्याचा धोका
त्याचवेळी, सध्याच्या सरकारच्या आयत शुल्क वाढीच्या परिणामांबद्दल आम्ही आमच्या एक्सपर्टकडूनही जाणून घेतले आहे. बोनान्झाचे वरिष्ठ कमोडिटी संशोधन विश्लेषक निरपेंद्र यादव म्हणतात की, “वाढीव आयात शुल्कामुळे अधिकृत सोने आयात कमी होऊ शकते आणि यामुळे भारतीय रुपयाला व चालू खात्यातील तुटीला आधार मिळू शकतो पण, दागिन्यांची मागणी मंदावल्यामुळे तस्करीची शक्यता वाढू शकते.”
याशिवाय बोनान्झाचे रिसर्च ॲनालिस्ट बालाजी राव मुदिली यांनी उद्योग क्षेत्राच्या अपेक्षांकडे लक्ष वेधले. “आयात शुल्क वाढल्यामुळे मागणीच्या प्रमाणात घट होऊ शकते, पण पूर्णपणे कोसळणार नाही आणि भाव जास्त असल्याने विक्रीचे मूल्य अजूनही वाढू शकते. उद्योग क्षेत्रासाठी मोठी चिंता तस्करीची आहे, कारण जास्त आयात शुल्कांमुळे सोन्याचा अनधिकृत ओघ आणि तस्करीचे प्रमाण पुन्हा वाढू शकते ज्यामध्ये 2024 मध्ये सरकारने शुल्क कमी केल्यानंतर कमी आली होती.”
दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर टायटन, कल्याण आणि सेन्को यांसारख्या सूचीबद्ध ज्वेलर्सवर विक्रीचा दबाव दिसत असून सोन्याच्या खरेदीतील निरुत्साहाचा लहान व्यापारी, ज्वेलर्स आणि कारागिरांवर परिणाम होऊ शकतो. यामुळे सूचीबद्ध आणि मोठ्या रिटेलर्सना धोरणात्मक बदल करावा लागू शकतो, ज्यात आपला बाजारहिस्सा वाढवण्यासाठी आक्रमकपणे नवीन दुकाने उघडू शकतात, विपणन मोहिमा वाढवू शकतात आणि प्रमोशनल ऑफर्स व EMI योजना आणू शकतात.
काळ्या बाजारात नफ्याच्या संधी
आनंद राठी शेअर्स अँड स्टॉक ब्रोकर्सच्या कमोडिटी संशोधन विश्लेषक दिव्या मांडलिया म्हणतात की पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर दागिन्यांच्या उद्योगात आता स्पष्ट दुफळी दिसून येत आहे. टायटन कंपनीसारख्या मोठ्या संघटित कंपन्यांनावाढलेल्या किमती आणि कमकुवत भावनांमुळे, विशेषतः ऐच्छिक दागिन्यांच्या खरेदीसाठी मागणीची वाढ मंदावण्याची भीती आहे. त्याचवेळी, व्यापाऱ्यांनाआयात शुल्कामुळे अनधिकृत किंवा तस्करी केलेल्या सोन्याचा ओघ वाढण्याची अपेक्षा आहे, कारण महागड्या कायदेशीर आयातीमुळे काळ्या बाजारात नफ्याच्या मोठ्या संधी निर्माण होतात.
एकूणच, ज्वेलरी उद्योग सध्या एका संक्रमण परिस्थितीत एन्ट्री घेत आहे, जिथे मागणी हलक्या वजनाच्या दागिन्यांकडे वळत आहे आणि सोन्याची आयात मंदावली आहे. कालांतराने मोठे संघटित ब्रँड्स बाजारातील आपला वाटा वाढवू शकतात, तर लहान सराफांना वाढता खर्च, कमी नफा आणि अनधिकृत पुरवठा मार्गांमुळे दबावाचा सामना करावा लागत आहे.
