कांद्याचे भाव घसरले! क्विंटलला 50 रुपये दर, नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये संताप

अवकाळी पाऊस, गारपीट आणि उत्पादन खर्चाच्या वाढत्या ओझ्यामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणीत आता कांद्याच्या घसरलेल्या दरामुळे आणखी भर पडली आहे. सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (दि. ७) कांद्याला अवघा ५० रुपये प्रति क्विंटल दर मिळाल्याने शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला आणि बाजार समिती परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

बागलाण तालुक्यातील कऱ्हे येथील शेतकरी जितेंद्र साळुंखे यांनी आपला कांदा विक्रीसाठी सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीत आणला होता. मात्र लिलाव प्रक्रियेदरम्यान त्यांच्या कांद्याला केवळ ५० रुपये प्रति क्विंटल इतकाच दर मिळाल्याचे समोर आले. हा दर ऐकताच उपस्थित शेतकरी संतप्त झाले. आधीच नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे नुकसान सहन करावे लागले असताना बाजारातही योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. संतप्त शेतकऱ्यांनी कांदा भरलेला ट्रॅक्टर थेट बाजार समितीच्या कार्यालयासमोर उभा करून आंदोलन सुरू केले. ‘उत्पादन खर्चही निघत नाही, मग शेती करायची कशी?’ असा सवाल करून शेतकऱ्यांनी व्यापारी संगनमताने कमी दर देत असल्याचा आरोप केला; तसेच बाजार समिती प्रशासन शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण करण्यात अपयशी ठरत असल्याची टीकाही करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *