मुंबईत 100 किमी लांब मेट्रो नेटवर्क तयार! पुढे 16 नव्या मार्गांवर विकास होणार; ठाणे, नवी मुंबई, विरारपर्यंत विस्तार

भारताच्या आर्थिक राजधानीत सध्या पायाभूत सुविधांचा विस्तार सुरू आहे. सागरी किनाऱ्यावर मार्ग, पूलांपासून ते भूमिगत मार्गांपर्यंत देशात अनेक बदल घडत आहेत. येत्या 50 वर्षांत शहराचे चित्र पूर्णपणे बदलणार असून मुंबई सिंगापूर किंवा दुबईसारख्या शहरांना टक्कर देईल का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सध्या मुंबईच्या विकासासाठी एकूण 60 अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्यात आली आहे. याअंतर्गत शहरात मेट्रोचे जाळे विकसित होत असून वाहतूकीची व्यवस्थाही सुधारणार आहे.

सागरी सेतूचा विकास

मुंबईसह उपनगरांमध्ये सध्या मेट्रोच 16 नव्या मेट्रो मार्गिका उभारण्याची योजना आहे. या 16 मार्गांवर मेट्रो नेटवर्कचे जाळे बांधण्यात येणार आहे. यामुळे शहरातील वाहतुकीची समस्या अगदी गायब होऊन जाईल. या परिवर्तनाला शहरात सुरुवात झाली आहे. अटल सेतू या परिवर्तनातील प्रमुख प्रकल्प आहे. अटल सेतू देशातील सर्वात लांब पल्ल्याचा सागरी सेतू आहे. 21.8 किमी लांब हा पूल दक्षिण मुंबईला नवी मुंबईशी जोडतो. यामुळे 1 तासाचा कालावधी लागणारा प्रवास आता केवळ 20 मिनिटांत पूर्ण होतो.

मेट्रो 100 किमी लांब

मुंबईत मेट्रो नेटवर्कने 100 किलोमीटरचा टप्पा ओलांडला असून यापुढेही विस्तार सुरू राहणार आहे. 2025मध्ये सुरू झालेली भुयारी मेट्रो (अॅक्वा लाइन) कफ परेडला थेट छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विमानतळापर्यंत जोडते. यामुळे विमानतळावर पोहोचण्यासाठी प्रवाशांना वाहतूक कोंडीत प्रवास करावा लागत नसूव कॅब व टॅक्सीच्या भाड्यामुळे खिशाला कात्री बसत नाही. त्यानंतर एप्रिल 2026मध्ये मेट्रो लाइन 9चं उद्घाटन झालं. यामुळे प्रथमच मुंबईतून बाहेर ठाणे शहरापर्यंत मेट्रो पोहोचली. ठाणे शहरात सध्या अनेक नव्या मेट्रो मार्गिकांचा विस्तार होत आहे.

दरम्यान, रस्ते विकासापैकी दुसरा प्रमुख प्रकल्प म्हणजे कोस्टल रोड. कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्यामुळे मरीन ड्राईव्ह ते वरळीपर्यंत प्रवासाचा कालावधी 40 मिनिटांवर 12 मिनिटांवर आला आहे. त्यात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची सुरूवात झाली आहे. वर्षाअखेर विमानतळाची 9 कोटी प्रवासी हाताळण्याची तयारी आहे. याशिवाय मुंबईतील सर्वात लांब भुयारी मार्गाचे कामही सुरू आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणारा ठाणे-बोरिवली जुळ्या बोगदा शहराच्या उत्तरेकडील वाहतूक कोंडी कमी करणार आहे. शहरातील दाट लोकवस्ती आणि रेल्वे, रस्तेजाळे पाहून, बहुतेक प्रकल्पांचा विकास भूमिगत किंवा उन्नत मार्गांवर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोणत्या मार्गिकांचं बांधकाम सुरू?

याशिवाय देशातल्या पहिल्या बुलेट ट्रेनची सुरुवात देखील मुंबईपासून सुरू होणार आहे. मुंबई ते अहमदाबाद 508 किमी लांब बुलेट ट्रेन मार्गाचा विकास सुरू आहे. सध्या मुंबईत 4 मेट्रो लाइन पूर्णपणे कार्यन्वित आहेत तर काही मेट्रो टप्प्या-टप्प्याने सुरू करण्यात आले आहेत. यामध्ये अनेक मेट्रो मार्गिकांचा समावेश आहे. मेट्रो लाइन 2बी (डी. एन. नगर ते मंडाले), मेट्रो लाइन 4 ( वडाळा ते कासारवडवली), मेट्रो लाइन 4ए ( कासरवडवली ते गायमुख), मेट्रो लाइन 5 (ठाणे-भिवंडी-कल्याण), मेट्रो लाइन 6 (स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी), मेट्रो लाइन 7ए ( गुंडवली ते CSMIA), मेट्रो लाइन 9 (दहिसर ते मिरा भाईंदर) आणि मेट्रो लाइन 12 ( कल्याण-तळोजा) या मार्गांचं बांधकाम सुरू आहे.

याशिवाय शहरात मेट्रो लाइन 8 (मुंबई ते नवी मुंबई विमानतळ), मेट्रो लाइन 10 (गायमुख ते शिवाजी चौक) मेट्रो लाइन 11 (वडाळा ते CSMT), मेट्रो लाइन 13 ( शिवाजी चौक ते विरार) आणि शहरातील सर्वात लांब मेट्रो लाइन 14 (कांजूर मार्ग ते बदलापूर) या मेट्रो मार्गांना मंजुरी मिळाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *