आज सोमवारी पहाटे मुंबई शहरात एक भीषण अपघात झाला. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मरीनड्राईव्ह परिसरात मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या एका वृद्ध व्यक्तीला दोन बाईकस्वारांनी धडक दिली. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला. यामध्ये एक ज्येष्ठ व्यक्ती, एक तरुण आणि एका तरुणीचा समावेश आहे. आज पहाटे सहा वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. सध्या पोलीस या घटनेचा तपास करत असून अपघात नेमका कोणत्या कारणामुळे घडला? याचा संपूर्ण तपशील समोर आलेला नाही.
नेमका कसा झाला अपघात?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गिरगाव परिसरातील एक ज्येष्ठ व्यक्ती आज सोमवारी पहाटे सहा वाजताच्या सुमारास मरीनड्राईव्ह येथे मॉर्निंग वॉकसाठी आलेले होते. त्यावेळी रस्त्यावरुन दोन भरधाव बाईक जात होत्या. या दोन्ही दुचाकींनी या ज्येष्ठ व्यक्तीला धडक दिली. त्यामुळे बाईकवरील तरुण-तरुणीही खाली पडले. दोन्ही बाईक खूप वेगात असल्याने वृद्ध व्यक्ती आणि बाईकवर असणाऱ्यांना गंभीर इजा झाली होती. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना तातडीने जीटी रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, रुग्णालयात उपचारादरम्यान तिघांचा करुण अंत झाला. पोलिसांनी मृतांच्या नातेवाईकांना संपर्क साधला असून त्यांची ओळख पटवण्याचं काम सुरु आहे. तर दुसऱ्या बाजूला मरीनड्राईव्ह पोलीस हा अपघात नेमका कसा घडला? याचा तपास करत आहेत.
प्रत्यक्षदर्शींनी आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात इतका भीषण होता की, दोन्ही बाईकची चाकं, सायलेन्सर आणि चेसिसचा भाग निखळून पडला होता. या दोन्ही बाईक प्रचंड वेगात होत्या. कदाचित नाईट आऊट करुन हे बाईकस्वार घरी जात असावेत. दोन्ही बाईक एकमेकांपासून जवळच्या अंतरावर होत्या. या दोन्ही बाईकने वृद्ध व्यक्तीला धडक दिली. या बाईकस्वारांमध्ये रेस सुरु होती का? याचाही पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.
डोंबिवलीकर तरुणाने अटल सेतूवरुन आयुष्य संपवलं
देशातील सर्वाधिक लांबीच्या शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूचे १२ जानेवारी २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर सुसाट प्रवासाच्या सोयीबद्दल हा सेतू चांगलाच चर्चेत आला. मात्र काही महिन्यांनी एका व्यक्तीने या सेतूवरून उडी मारत आयुष्याची अखेर केल्याची घटना घडली. आता ती घटना पुन्हा चर्चेत आली आहे. संबंधित नागरिकाच्या मृत्यूचा दाखला हद्दीच्या वादावरून तब्बल पावणे दोन वर्षे मिळू शकला नसल्याने त्याच्या पत्नीला त्यासाठी थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली आहे.
