लग्नासाठी अल्पवयीन मुलीचं अपहरण, हात-पाय बांधून जिल्हा परिषदेच्या शाळेत डांबलं अन्…; महाराष्ट्राला हादरवणारी घटना

लग्नासाठी नकार दिल्याच्या रागातून अल्पवयीन मुलीचं अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इतकंच नाही तर तिचं अपहरण केल्यानंतर हात-पाय बांधून डांबून ठेवलं होतं. गोंदियामध्ये घडलेल्या या घटनेमुळे महाऱाष्ट्र हादरला आहे. दुसऱ्या दिवशी शाळेचा दरवाजा उघडल्यानंतर ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटक केली आहे. त्याच्याविरोधात दवनीवाडा पोलिसांनी पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

नेमकं काय घडलं?

नराधमाने गावातील अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिच्यावर अत्याचार केले. नंतर त्याने पीडितेचे हात-पाय आणि तोंड बांधून तिला जिल्हा परिषद शाळेच्या खोलीत डांबून ठेवलं. होतं. गोंदियाच्या दवनीवाडा पोलीस स्टेशन अंतर्गत हा सगळा प्रकार घडला आहे. या घटनेमुळे तिरोडा तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी दवनीवाडा पोलिसांनी आरोपी सुमित ऊईके (21) याच्याविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

जबरदस्तीने दुचाकीवर बसविले आणि अपहरण केले

तिरोडा तालुक्यातील अल्पवयीन पीडित मुलगी आणि आरोपी सुमित ऊईके हे एकाच गावातील रहिवासी असून गेल्या 2 वर्षांपासून त्यांच्यात ओळख होती. 3 महिन्यांपूर्वी आरोपीने पीडितेच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. मात्र, त्यानंतरही आरोपीचा छळ थांबला नाही. घटनेच्या दिवशी आरोपीने पीडितेला जीवे मारण्याची धमकी देऊन तिला जबरदस्तीने दुचाकीवर बसविले आणि तिचे अपहरण केले.

‘माझ्याशी लग्न कर, नाहीतर तुला जीवे मारीन’ 

यानंतर त्याने तिला गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या एका खोलीत नेलं. ‘माझ्याशी लग्न कर, नाहीतर तुला जीवे मारीन’ अशी धमकी देत लग्नासाठी दबाव टाकला. पीडितेने ठामपणे नकार दिला असता, आरोपीने क्रूरतेचा कळस गाठला. त्याने पीडितेचे तोंड, हात आणि पाय ओढणीने घट्ट बांधून तिला त्याच खोलीत बंद केलं आणि स्वतः तिथून पळ काढला.

दुसऱ्या दिवशी शाळा उघडण्यात आली तेव्हा हा प्रकार समोर आला. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आरोपीला पोलिसांनी रात्री उशिरा अटक केल्याची माहिती तिरोड्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी साहिल झरकर यांनी बोलताना दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *