स्वतःला कधी कृष्ण तर कधी शंकराचा अवतार भासवणाऱ्या अशोक खरातचा आणखी एक कारनामा समोर आला आहे, महिलांना जाळ्यात ओढायची त्याची मोडस ऑपरेंडी समोर आली आहे. खरातला पाचव्या गुन्ह्यात अटक केली असून न्यायालयाने त्याला २३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. खरात एका विशिष्ट पद्धत वापरून महिलांवर लैंगिक अत्याचार करत असल्याचं चौकशीतून समोर आलं आहे. सरकारी वकील आणि पोलिसांनी न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार, खरात पीडित महिलांना विश्वासात घेऊन त्यांना प्रसादाच्या नावाखाली ”पेढा” खायला द्यायचा. या पेढ्यात तो ”गुंगीचे औषध” मिसळत असल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. केवळ पेढाच नाही, तर काही प्रकरणांमध्ये पाणी पितानाही त्यात गुंगीचे औषध मिसळून महिलांना बेसावध केलं जायचं. महिला बेशुद्ध पडताच हा भोंदू त्यांच्या हतबलतेचा फायदा घेत त्यांच्यावर अत्याचार करायचा.
खरातवर आतापर्यंत १७ गुन्हे दाखल झाले असून खरातने तब्बल ३३ दिवस पोलीस कोठडी भोगली आहे. प्रत्येक वेळी तो आजारपणाचे नाटक करून पोलिसांपासून वाचण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे न्यायालयानं आता त्याच्या वैद्यकीय तपासणीचे आदेश दिले आहेत. प्रसादाच्या नावाखाली गुंगीचे औषध देऊन महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या या ”भोंदूगिरीच्या कॅप्टन”ला कडक शासन व्हावे अशी मागणी नाशिककरांमधून होत आहे. त्याला जामीन मिळू नये तसेच त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी पोलिसाना आता कसोशीने प्रयत्न करावे लागणार आहे.
महिलांना जाळ्यात ओढून नराधम खरात त्यांचं लैंगिक शोषण करत होता, त्यामुळे खरातला गुंगीचं औषधी कुणी दिलीत, यामध्ये अजून कोणाचा समावेश आहे का? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
