येत्या चार ते पाच दिवसांमध्ये भारताच्या वायव्य, मध्य आणि लगतच्या पूर्व भागामध्ये तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट जाणवण्याचा अंदाज आहे. भारतीय हवामान विभागाने यासंदर्भात इशारा दिला आहे.
हरियाणा, चंडीगड, दिल्ली, पंजाब, पूर्व राजस्थान, विदर्भ, छत्तीसगड, पश्चिम उत्तर प्रदेश, पश्चिम राजस्थान, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, झारखंड, ओडिशा येथील काही तुरळक भाग आणि पूर्व उत्तर प्रदेशातील तुरळक भागांमध्ये २० एप्रिल ते २५ एप्रिल या कालावधीत वेगवेगळ्या तारखांना उष्णतेची लाट जाणवण्याची शक्यता असल्याचे भारतीय हवामान विभागाने सांगितले आहे. पश्चिम बंगालमध्ये गंगेच्या खोऱ्यात तुरळक भागांमध्ये २० ते २६ एप्रिल दरम्यान; तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकलमध्ये २० ते २२ एप्रिल दरम्यान; केरळ व माहे, आंध्र प्रदेशमध्ये २० ते २४ एप्रिल दरम्यान; तसेच गुजरातच्या किनारपट्टी भागात २४ आणि २५ एप्रिल रोजी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची दाट शक्यता आहे, असेही हवामान विभागाने सांगितले आहे.
हरियाणा, चंडीगड, पश्चिम उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि विदर्भ येथील काही तुरळक भागांमध्ये २० व २१ एप्रिल रोजी; छत्तीसगडमध्ये २० एप्रिल रोजी; आणि ओडिशातील काही भागांमध्ये २० ते २२ एप्रिल या कालावधीत रात्रीच्या वेळीही उष्णता जाणवण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर या लाटेचा सामना करण्यासाठी राज्यांनी उपाययोजना सुरू केल्या.
उत्तर प्रदेश, ओडिशा तापले
लखनऊ : उत्तर भारतातील अनेक शहरांमध्ये सोमवारी सरासरीपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. अनेक ठिकाणी ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमान नोंदवण्यात आले. उत्तर प्रदेशात सोमवारी प्रयागराजमध्ये ४४.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. वाराणसीमध्ये ४४ अंश, बंदा येथे ४३ अंश, तर सुलतानपूर येथे ४३.३ अंश तापमान होते. ओडिशातही काहिलीपासून दिलासा मिळाला नाही. राज्यातील १४ ठिकाणी सोमवारी ४० अंशांहून अधिक तापमानाची नोंद झाली. तितलागाव येथे ४२.५ अंश तापमान होते. तर झारखंडमध्ये शाळांच्या वेळात बदल करण्यात आले.
महाराष्ट्रात गारपिटीची शक्यता
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, मध्य प्रदेश, विदर्भ आणि छत्तीसगडमध्ये गारपीट होण्याचीही शक्यता आहे. कोकणामध्ये रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मंगळवारीही तुरळक ठिकाणी वीजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस येऊ शकतो. धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशीव तर विदर्भात चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर आणि यवतमाळ येथे मेघगर्जनेसह पाऊस पडू शकेल.
