राज्यात रिक्षा चालविण्यासाठी मराठी भाषा येणे बंधनकारक करण्यात आले असून, याबाबत १ मेपर्यंत तपासणी करून नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार येईल, असा इशारा परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी दिला. राज्यातील बेकायदा बाइक टॅक्सी सेवेवर कारवाई करत ओला, उबर आणि रॅपिडो यांच्या परवान्यांना तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे, असेही ते म्हणाले.
ठाणे–मिरा भाईंदर परिसरातील वाढती वाहतूककोंडी कमी करण्यासाठी गायमुख रेतीबंदर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक (घोडबंदर) या मेट्रो-१० प्रकल्पाला गती देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. काशीगाव ते दहिसर चेक नाका या महत्त्वाच्या जोडणीनंतर पुढील आठवड्यात गायमुख ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या ९.७ कि.मी. अंतराच्या उन्नत मेट्रो प्रकल्पाची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली.
