रोजच्या आहारात जास्त प्रमाणात मीठ खाण्याची सवय अनेकांना नकळत लागलेली असते. जेवताना ताटात मीठ वाढुन घेणे, सलॅड खाताना अथवा फळांवर मीठ टाकून खाणे तसेच शिजवलेल्या अन्नावर वरून मीठ भुरभुरणे, पॅकेज्ड स्नॅक्स, लोणची, चिप्स किंवा हवाबंद डब्यातील पदार्थांचे जास्त सेवन केल्यामुळे शरीरात सोडियमचे प्रमाण वाढते आणि त्याचा थेट परिणाम हृदयाच्या आरोग्यावर होऊ शकतो. जास्त प्रमाणात मीठ खाणे शरीरासाठी आणि प्रामुख्याने हृदयासाठी अत्यंत घातक ठरू शकते. मिठातील सोडियम हे आरोग्यासाठी आवश्यक असले तरी, त्याचे अतिसेवन ‘स्लो पॉयझन’ मानले जाते. या मीठाच्या सेवनाने हृदयावर कसा परिणाम होतो आणि तो कसा रोखू शकतो याबाबत डॉ. बिपीनचंद्र भामरे, कार्डियाक सर्जन, सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, मुंबई यांनी माहिती दिली आहे.
मीठ आणि रक्तदाब यांचा थेट संबंध
मीठामध्ये असलेले सोडियम शरीराला मर्यादित प्रमाणात आवश्यक असते. मात्र जास्त प्रमाणात सोडियम घेतल्यास रक्तदाब वाढू शकतो. दीर्घकाळ उच्च रक्तदाब राहिल्यास हृदयावर अतिरिक्त ताण येतो आणि रक्तवाहिन्यांच्या आतील भिंतींना इजा होण्याचा धोका वाढतो. यामुळे अॅथेरोस्क्लेरोसिस सारखी समस्या निर्माण होऊ शकते. या स्थितीत रक्तवाहिन्यांमध्ये चरबी साचून त्या अरुंद व कडक होतात. परिणामी हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि इतर हृदयविकारांचा धोका वाढतो. उच्च रक्तदाब हा अनेकदा कोणतीही लक्षणे न आढळता वाढत जातो. त्यामुळे अनेकांना उशिराने याची जाणीव होते. म्हणूनच रोजच्या आहारात मीठाचे प्रमाण नियंत्रणात ठेवणे अत्यंत गरजेचे आहेत असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. जागतिक आरोग्य तज्ज्ञांच्या मते, एका प्रौढ व्यक्तीने दिवसाला सुमारे ५ ग्रॅम (एक टीस्पूनपेक्षा कमी) मीठ सेवन करणे सुरक्षित मानले जाते. मात्र अनेक लोक यापेक्षा दुप्पट मीठ नकळत खातात, कारण तयार पदार्थांमध्ये आधीच मीठ जास्त असते.
मिठामुळे शरीरावर होणारे परिणाम
उच्च रक्तदाब (High Blood Pressure)
जास्त मीठ खाल्ल्याने रक्तातील सोडियमची पातळी वाढते, ज्यामुळे शरीरात पाणी साठून राहते (Water Retention). यामुळे रक्ताचे प्रमाण वाढते आणि रक्तवाहिन्यांवर ताण येतो, परिणामी उच्च रक्तदाब निर्माण होतो.
