मुंबईत बुलेट ट्रेनचं काम सध्या सुरू आहे. हे स्थानकं तयार होताच नागरिकांना शहरातीस इतर वाहतुकीच्या पर्यायांचा सहजपणे उपयोग करता येईल यासाठी बुलेट ट्रेनच्या स्थानकांपासून कनेकटीव्हिटी वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे. ही सर्व स्थानकं शहरातील वाहतूक व्यवस्थेला जोडून तयार केली जाणार आहेत.
प्रवाशांना मोठा फायदा
हाय-स्पीड रेल्वेला शहरातील वाहतुकीसोबत सहजपणे जोडण्यासाठी मल्टी मोडल इंटिग्रेशन (MMI) प्रणाली विकसित करण्यात येणार आहे. याअंतर्गत बुलेट ट्रेन स्थानकांवर ‘स्टेशन प्लाझा’ तयार केले जाणार आहेत. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या 508 किमी लांब मार्गाची NHRCLद्वारे अंमलबजावणी होत आहे. यावेळीच हे स्टेशन प्लाझा सुद्धा विकसित केले जाणार आहेत. यामुळे प्रवाशांना स्थानकांवर प्रवेश करताना कोणत्याही अडचणी येणार नाहीत.
बुलेट ट्रेनच्या प्रवाशांची लास्ट माइल कनेकटीव्हीटी सुधारण्यासाठी हे प्लाझा तयार केले जात आहेत. यामुळे प्रवाशांना बस, टॅक्सी, किंवा इतर वाहनांपर्यंत पोहचता येणार आहे. या उपक्रमांतर्गत बुलेट ट्रेन स्थानकांच्या आजूबाजूच्या परिसरात विकास केला जाणार आहे. या स्टेशन प्लाझामुळे स्थानकांवर गर्दी होणार नाही. तसेच, नागरिकांना बस किंवा रिक्षासाठी सामानासोबत लांब प्रवास करण्याची गरज नाही. बुलेट ट्रेनमधून उतरताच त्यांना थेट स्टेशन प्लाझावरून पुढील वाहतुकीचा पर्याय निवडता येणार आहे.
अनेक सुविधा उपलब्ध
नियोजित स्टेशन प्लाझा एका सार्वजनिक जागेसारखी विकसित केली जात आहे. या भागांत पार्किंग झोन, पिक-अप आणि ड्रॉप-ऑफ पॉईंट, पादचाऱ्यांसाठी स्वतंत्र मार्ग, आधुनिक पथदिवे, सीसीटीव्ही व्यवस्था असणार आहेत. याशिवाय प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अग्निशामकही बसवली जाणार आहेत. सध्या या सुविधा गुजरातमधील सुरत, बिलिमोरा, वापी, भरूच, आनंद आणि वडोदरासह काही स्थानकांवर हे स्टेशन प्लाझा विकसित करण्याचे कंत्राट दिले आहेत.
यानंतर महाराष्ट्रातील ठाणे, बोईसर, विरार स्थानकावरही सेवा सुरू करण्यात येणार आहे. सध्या भारतातील पहिली बुलेट ट्रेन 15 ऑगस्ट 2027 रोजी सुरू होणार आहे. यामुळे मुंबई ते अहमदाबाद प्रवासाचा वेळ कमी होणार असून, प्रवास सुखकर होणार आहे.
