खारघर-तुर्भे लिंक रोड प्रकल्पाचा काम सध्या वेगाने सुरू आहे. या मार्गामुळे नवी मुंबईतील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. या प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अधिवेशनात बोलताना महत्त्वाची माहिती दिली आहे. हा प्रकल्प सप्टेंबर 2028पर्यंत पूर्ण होणार आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.
प्रवासाचा वेळ 10 मिनिटांवर
सध्या खारघर ते तुर्भे रस्तेमार्गे प्रवासाला अर्धा तास लागतो. परंतु, वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे वाहतूक कोंडीही वाढली आहे. यामुळे गर्दीच्या काळात 40 मिनिटांपर्यंत वेळ प्रवासातच जातो. त्यामुळे नवी मुंबई ते खारघर भुयारी लिंक रोडचा प्रकल्प सिडकोने हाती घेतला आहे. या प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ 10 मिनिटांवर येणार आहे. या प्रकल्पासाठी एकूण 2,099 कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
कसा असेल मार्ग?
नवी मुंबईच्या पूर्वेकडे तुर्भेपासून हा लिंक रोड सुरू होतो. सायन-पनवेल महामार्गालगतच जुई नगर रेल्वे स्थानकाजवळ या लिंक रोडचं बांधकाम सुरू आहे. त्यानंतर खारघरमध्ये सेंट्रल पार्कजवळ हा मार्ग संपतो. तुर्भे सेक्टर 21 पासून सुरू होणार हा मार्ग सायन-पनवेल महामार्गाला समांतर असेल. त्यानंतर पार्सिक डोंगरामधून दुहेरी बोगद्यातून मार्ग जातो. 1.7-.18 किमीचे दुहेरी बोगदे खारघरमध्ये संपतात. तिथून 30 मीटर रुंद मार्ग सेंट्रल पार्कजवळ संपतो. खारघरच्या सेक्टर 34/35 परिसरात स्थानिक मार्गांशी जोडला जाणार आहे. हा संपूर्ण मार्ग 5.14 किमी लांब असणार आहे. या प्रकल्पामुळे तुर्भे,खागघरसह जुईनगर, सानपाडामधील प्रवाशांनाही फायदा होणार आहे.
मुंबईमधील प्रवाशांनाही फायदा
सध्या सिडकोकडून तळोजा-पेंधर ते खारघर रस्त्याचं काम सुरू आहे. या मार्गाला मुंबईशी जोडणी असल्यामुळे लिंक रोड तयार होताच मुंबईवरून थेट तळोजा एमआयडीसीत पोहचता येणार आहे. तळोजा एमआयडीसीमध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचारी येतात. यामुळे त्यांना प्रवासाचा एक वाहतूक कोंडीमुक्त मार्ग मिळणार आहे.
2022 मध्ये प्रस्तावित या प्रकल्पाचं काम 2024मध्ये सिडकोने सुरू केलं. 2025पासून बोगद्यांचं काम सुरू झालं असून 2028पर्यंत प्रकल्प नागरिकांसाठी खुला होईल अशी आशा आहे. हा मार्ग सुरू होताच नवीन तयार झालेल्या नवी मुंबई विमानतळापर्यंत प्रवासही सोपा होणार आहे. तसेच, नवी मुंबईतील मेट्रोशीही हा मार्ग थेट जोडला जाणार आहे.
