पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडण्यासाठी गोरेगाव-मुलुंड लिंक रोड उभारला जात आहे. या प्रकल्पाअंतर्गत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखाली 4.7 किलोमीटर लांबीचा जुळा बोगदा बांधला जाणार आहे. या बोगद्यामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरांमधील प्रवासाचा वेळ 75 मिनिटांवरून 25 मिनिटांपर्यंत कमी होईल.
मुंबईतील पूर्व-पश्चिम कनेक्टिव्हिटी मजबूत करण्याच्या उद्देशाने बनवण्यात आलेल्या गोरेगाव-मुलुंड लिंक रोड (GMLR) प्रकल्पाची डिसेंबर 2028 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका ( BMC ) हा प्रकल्प राबवत आहे. सुमारे 12.2 किलोमीटर लांबीचा हा कॉरिडॉर पश्चिम भागातील गोरेगावला पूर्व भागातील मुलुंडशी थेट जोडेल. एकदा कार्यान्वित झाल्यानंतर, या रस्त्यामुळे दोन्ही भागांमधील प्रवासाचा वेळ अंदाजे 90 मिनिटांवरून सुमारे 20 मिनिटांपर्यंत कमी होईल, ज्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि आरे परिसरातून जाणारा एक जुळा बोगदा
जीएमएलआर प्रकल्प अनेक टप्प्यात बांधत आहे. या मार्गावर उड्डाणपूल, उन्नत रस्ते आणि इंटरचेंजचे यांचा समावेश आहे. या प्रकल्पाचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि आरे क्षेत्राखालून जाणारा जुळा बोगदा, जो वाहतूक सुलभ करण्यासाठी आणि विद्यमान पूर्व-पश्चिम मार्गावरील गर्दी कमी करण्यासाठी डिझाइन केलेला आहे.
विविध विभागांवर काम प्रगतीपथावर आहे. या प्रकल्पाला आधीच खूप विलंब झाला आहे. आता हा प्रकल्प 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे टार्गेट ठेवले आहे. हा प्रकल्प जीएमएलआर वाहतूक कोंडी कमी करण्यात आणि मुंबईच्या उपनगरीय नेटवर्कमध्ये कनेक्टिव्हिटी सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल.
या प्रकल्पाची वैशिष्ट्ये
गोरेगाव-मुलुंड लिंक रोड (लिंक रोड) प्रकल्पांतर्गत, बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात 4.7 किमी लांबीचे आणि 45.70 मीटर रुंदीचे जुळे बोगदे बांधले जातील.
एकूण लांबी 6.65 किमी असेल, ज्यामध्ये अप्रोच रोड आणि इतर जोडणी पैलूंचा समावेश असेल.
जुळे बोगदे 20 ते 160 मीटर जमिनीखाली खोलवर असतील.
दोन्ही बोगदे प्रत्येकी 300 मीटर अंतराने जोडले जातील.
अंदाजे 14.2 मीटर व्यासाच्या टनेल बोरिंग प्लांट (TBM) वापरून बोगदे खोदले जातील.
बोगद्यांमध्ये आधुनिक प्रकाशयोजना, वायुवीजन प्रणाली, अग्निसुरक्षा प्रणाली, सीसीटीव्ही कॅमेरे आणि बोगद्याच्या दोन्ही बाजूंना नियंत्रण कक्ष असतील.
आरे, विहार आणि तुलसी तलावासह संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वनस्पती आणि प्राण्यांना त्रास न देता बोगदे बांधले जातील.
दरवर्षी सुमारे 22 हजार 400 टन कार्बन उत्सर्जन कमी होईल.
मुंबईकरांचा प्रवासाचा वेळ आणि इंधन देखील वाचेल.
