पुरस्कार परत करणार नाही : डॉ. सदानंद मोरे

पुरस्कार परत करणार नाही : डॉ. सदानंद मोरे

या सरकारने मला पुरस्कार दिला नाही, त्यामुळे मी परत करणार नाही, असं संत साहित्याचे अभ्यासक, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. सरकारच्या निषेधाचा हा योग्य मार्ग आहे, असं वाटत नसल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं.

सरकारचा निषेध किंवा टीका करण्यासाठी पुरस्कार परत करणं योग्य नाही. ज्यांना हा मार्ग योग्य वाटतो त्यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येनंतर पुरस्कार का परत केले नाहीत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. दाभोलकर-पानसरे हत्येनंतर सगळे गप्प का होते असं विचारत सध्याच्या घडामोडी चिंताजनक असल्या तरी पुरस्कार परत करणं योग्य वाटत नाही, अशी प्रतिक्रिया डॉ. सदानंद मोरेंनी दिली आहे. साधना प्रकाशनने त्यांचं पुस्तक प्रकाशित केलं त्यावेळी प्रकट मुलाखतीत ते बोलत होते.

डॉ. मोरे यांनी 88 व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषवलं होतं. संत तुकाराम दर्शन पुस्तकासाठी त्यांनी साहित्य अकादमी पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. नयनतारा सहगल, अशोक वाजपेयी यांसारख्या नामवंत साहित्यिकांपाठोपाठ ज्येष्ठ भाषाशास्त्रज्ञ गणेश देवी आणि प्रसिद्ध कोकणी लेखक एन. शिवदास यांनी साहित्य अकादमी पुरस्कार परत केला आहे. विचारवंतांवरील हल्ले, धार्मिक दंगली, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला इत्यादी कारणांमुळे साहित्य क्षेत्रात प्रचंड नाराजी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *