पालघर जिल्ह्यातील जलमार्गाद्वारे पालघर व वसई तालुक्याला जोडणाऱ्या सफाळेजवळील जलसार जेटी ते विरारजवळील मारंबळपाडा जेटीदरम्यान सुरू करण्यात आलेल्या जलवाहतुकीचा गेल्या दहा महिन्यांत मोठ्या प्रमाणात लाभ प्रवाशांनी घेतला आहे. या कालावधीत एक लाखाहून अधिक प्रवासी, ७८ हजार ४६० वाहने तसेच ७,५४५ जनावरे या जलमार्गातून सुरक्षित वाहून नेण्यात आली आहेत. त्यामुळे या दोन्ही तालुक्यांतील प्रवाशांना या सेवेचा मोठा फायदा होत आहे. विशेष म्हणजे, महामार्गावर वाहतूककोंडीतही हा जलमार्ग प्रवाशांना आधार ठरत आहे.
वाहतूक कोंडीला उपाय
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर काँक्रिटीकरणाचे काम सुरू असताना, मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळे अनेक वेळा नागरिक व प्रवासी अडकून पडत होते आणि त्यांना मनस्ताप सहन करावा लागत होता. भाईंदर ते नायगाव दरम्यानच्या खाडीवर पूल उभारण्याच्या दृष्टीने तसेच वसई तालुक्यातील विरार जवळील नारिंगी ते पालघर तालुक्यातील सफाळे जवळील जलसार किंवा दातीवरेदरम्यान पूल बांधण्याचा प्रस्ताव सुमारे पंधरा वर्षांपूर्वी मंजूर झाला होता. मात्र, निधी उपलब्ध न झाल्याने तो प्रकल्प रखडला. त्यामुळे नागरिकांना वसई, ठाणे, भाईंदर व मुंबईकडे जाण्यासाठी मुंबई-आमदाबाद राष्ट्रीय महामार्गाचाच वापर करावा लागत होता.
