भात खरेदी जोपर्यंत होत नाही, सर्वसामान्य शेतक-यांना भाताचा योग्य दर मिळत नाही, तोपर्यंत काँग्रेसचा सरकार विरूद्ध संघर्ष सुरूच राहणार आहे. येत्या काही दिवसात भात खरेदी झाली नाही तर यापुढे तीव्र आंदोलन छेडले जाईल. आजचे आंदोलन म्हणजे एक ट्रेलर होता.
भविष्यात आंदोलनाचे जे चित्र असेल ते आणखीच वेगळे असेल. जिल्हाधिकारी ई.रवींद्रन हे जनतेला धमकावण्याचे काम करत आहेत. अशा धमक्या द्याल तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही. यापुढे जिल्हाधिका-यांनी विचारपूर्वक तोंडातून शब्द काढावा, असा इशारा आमदार नितेश राणे यांनी भात गोडावून खाली आंदोलनानंतर पत्रकार परिषदेत दिला.
कणकवली, कुडाळ, सावंतवाडी या तीन मतदारसंघांमध्ये जो शेतक-यांचा उद्रेक झाला त्याला पालकमंत्री दीपक केसरकर, जिल्हाधिकारी ई.रवींद्रन जबाबदार आहेत. ब्रिटीश राजवट असल्याप्रमाणे कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून जी जबरदस्ती करण्यात आली. महिला कार्यकर्त्यांना ज्या पद्धतीने जी वागणूक देण्यात आली ती संतापजनक होती.
मात्र या आंदोलनाला खरं यश कुडाळ तालुक्यात आलेले आहे. आंदोलनाच्या ठिकाणी जागेवर भात खरेदी करण्यात आली. १ हजार ३६० रुपये प्रति क्विंटल भाताला दर कुडाळ तहसीलदार यांनी दिला आणि ते भात खरेदीचे आदेश दिले. शेतक-यांचा कुडाळ तालुक्यात जसा फायदा झाला तसा फायदा कणकवली आणि सावंतवाडी तहसीलदारांना करून देणे का जमले नाही? असा सवाल आमदार नितेश राणे यांनी केला.