मध्य रेल्वेच्या उपनगरीय गाडीतील मोटार कोचच्या डब्याला बुधवारी दुपारी टिटवाळा स्थानकावर अचानक आग लागली. मात्र मोटरमनने तब्बल १० किलोमीटर लोकल चालवीत कल्याण रेल्वे स्थानकापर्यंत आणली.
यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या दरम्यान मोठी दुर्घटना घडली असती तर, त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
आसनगावहून कल्याणच्या दिशेने जाणारी ही लोकल टिटवाळा रेल्वे स्थानकावर येताच अचानक लोकलच्या मोटार कोचच्या डब्यातून धूर निघत असल्याचे लोकलचा गार्ड एम. जे. इक्बाल यांना लक्षात आले.
लोकल टिटवाळ्यातून पुढे आंबिवली स्थानकावर येताच आग आणखी भडकली. मात्र मोटरमन आणि गार्ड यांनी ही लोकल कल्याणपर्यंत आणून तेथे प्रवाशांना उतरवले आणि नंतर कल्याण रेल्वे स्थानकावरच गाडी सायडिंगला लावून ही आग विझविण्यात आल्याचे रेल्वे प्रवाशांनी सांगितले.
विशेष म्हणजे, ही आग लागलेली असताना कल्याण अग्निशामक विभागाला या आगीची माहितीच देण्यात आली नाही. कल्याण रेल्वे स्थानकावरील नळाला पाईप लावून बादलीमध्ये पाणी नेऊन ही आग विझविण्यात आली, असे प्रवाशांनी सांगितले.