महिन्याभरापूर्वीच्या विनाशकारी भूकंपामध्ये उध्वस्त झालेल्या नेपाळमध्ये गुरुवारी पहाटेच्या सुमारास भूकंपाचे चार सौम्य धक्के जाणवले. नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये पहाटे साडेपाचच्या सुमारास ४.० रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवला.
काठमांडूच्या उत्तरेला असणा-या दोलाखा जिल्ह्यात ४.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा दुसरा धक्का जाणवला. २५ एप्रिलच्या भूकंपाच्या धक्क्यामध्ये या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जिवीत आणि वित्तहानी झाली होती.
पहाटे ३.०७ मिनिटांनी आणि ३.४० मिनिटांनी दोन धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर त्यांची तीव्रता ४.० होती. गोरखा-धाडींग जिल्ह्यामध्ये या भूकंपाचा केंद्रबिंदू आहे.
२५ एप्रिलच्या विनाशकारी भूकंपाच्या धक्क्यानंतर ४ रिश्टर स्केल किंवा त्यापेक्षा जास्त तीव्रतेचे आतापर्यंत २८० धक्के जाणवले आहेत. २५ एप्रिलच्या ७.९ रिश्टर स्केल आणि १२ मे च्या ७.३ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यांमध्ये आतापर्यंत नऊ हजार नागरीकांचा मृत्यू झाला असून, २१ हजारहून जास्त नागरीक जखमी झाले आहेत. या दोन मोठया धक्क्यांमुळे नेपाळमध्ये हजारो इमारतींचे नुकसान झाले.