धक्कादायक…सलमानच्या ‘हिट अँड रन’ खटल्याच्या फाइल्स जळून खाक

धक्कादायक…सलमानच्या ‘हिट अँड रन’ खटल्याच्या फाइल्स जळून खाक

‘हिट अँड रन’ खटल्यात दोषी ठरलेला अभिनेता सलमान खान याला झटपट मिळालेला जामीन आणि तुरुंगवारी टळून दुबईवारीची मिळालेली परवानगी, यावरून सुजाण-सजग जनतेत नाराजी-चीड असतानाच, आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. २०१२ मध्ये मंत्रालयाला लागलेल्या आगीत सलमानच्या ‘हिट अँड रन’ खटल्याशी संबंधित अनेक फाइल्स जळून खाक झाल्या आहेत. माहिती अधिकारांतर्गत राज्य सरकारनंच हा खुलासा केला आहे.

बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या विरोधात २००२ पासून सुरू असलेल्या ‘हिट अँड रन’ खटल्यात राज्य सरकारतर्फे आत्तापर्यंत किती वकील, कायदेतज्ज्ञ, सॉलिसिटर नियुक्त करण्यात आलेत आणि त्यावर किती खर्च झाला आहे, असा प्रश्न माहिती अधिकार कार्यकर्ते मन्सूर दर्वेश यांनी विचारला होता. विधी आणि गृहखात्याकडून याचं उत्तर अपेक्षित होतं. परंतु, त्यांच्याकडून भलतंच उत्तर मिळालंय आणि ते खेदजनक-संतापजनक आहे.

‘२१ जून २०१२ रोजी मंत्रालयाला लागलेल्या भीषण आगीत अनेक फाइल्स आणि कागदपत्रं जळून खाक झाली. त्यात ‘हिट अँड रन’ खटल्याशी संबंधित कागदपत्रंही होती. त्यामुळे तुम्हाला हवी असलेली माहिती देऊ शकत नाही’, असं पत्र राज्य सरकारकडून मन्सूर दर्वेश यांना मिळालंय. त्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केलंय. वकिलांची नावं किंवा त्यांच्यावरील खर्चाच्या माहितीप्रमाणेच सलमानविरोधातील काही महत्त्वाचे साक्षी-पुरावेही या आगीत जळालेले असू शकतात. ते कोर्टात सादर करायची वेळ आल्यास सरकार काय करणार?, असा प्रश्न या खुलाशामुळे निर्माण झालाय.

मंत्रालयाच्या आगीत जळालेल्या फाइल्स आणि कागदपत्रं नव्याने तयार करण्याचं आश्वासन सरकारनं दिलं होतं. परंतु, हे काम अजूनही झालं नसल्याचंच सलमानच्या खटल्यातून स्पष्ट होतं, असं दर्वेश यांनी नमूद केलं आहे.

दरम्यान, वांद्र्यातील ‘हिट अँड रन’ खटल्यात सलमान खानला सेशन्स कोर्टानं ६ मे रोजी दोषी ठरवलं होतं आणि पाच वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली होती. परंतु, नंतर हायकोर्टानं या शिक्षेला स्थगिती दिली असून सलमान जामिनावर सुटला आहे. आता तर त्याच्या दुबईवारीलाही हिरवा कंदील देण्यात आला आहे. त्यावरून, न्यायव्यवस्थेबद्दल जनमानसांतून टीकेचा सूर ऐकू येतोय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *