वारंवार डॉक्टर, परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांना होत असलेल्या त्रासाला वैतागून पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक पंकज गायकवाड आणि इतर १२ डॉक्टरांनी राजीनामे दिले. पंढरपूरचे उपजिल्हा रुग्णालय या तरुण डॉक्टरानी गेल्या काही वर्षांत नावारूपाला आणले होते. त्यामुळे या रुग्णालयाला चांगल्या कामगिरीबद्दल शासनाच्या आनंदीबाई जोशी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
काही वर्षांपूर्वी या रुग्णालयात रुग्ण खूप कमी संख्येने येत होते. अगदी यात्रेच्या काळातही रुग्णालय ओस पडलेले असे. मात्र, डॉ. पंकज गायकवाड, डॉ. मंदार सोनावणे यांच्यासह डॉ. गवळी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या शासकीय रुग्णालयाचे रुपडेच पालटून टाकले. दररोज ५०० हून अधिक रुग्ण या रुग्णालयात तपासणीसाठी येत असतात. महिला, बालविभागातही दररोज मोठमोठ्या शस्त्रक्रिया अत्यंत माफक खर्चात केल्या जात. अपघात विभागात २४ तास सेवा देण्यात येत होती. एकूणच सोलापूर जिल्ह्यातील सगळ्यात चांगले शासकीय रुग्णालय म्हणून याकडे पहिले जात. येथील लोकप्रतिनिधी भारत भालके यांनी पुढाकार घेऊन अनेक अद्ययावत उपकरणे येथे बसवले. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक भागांतून येथे रुग्ण खास उपचारासाठी येत असत. मात्र गेल्या काही महिन्यांपासून काही संघटना, काही पत्रकार आणि काही समाजकंटकांनी येथील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना विविध कारणांनी त्रास देण्यास सुरुवात केल्याचे या डॉक्टरांचे म्हणणे आहे. खोट्या बातम्या छापणे, उगाच वारंवार माहिती मागविणे या माध्यमातून त्रास देण्यात येत असल्याचे आधीक्षक पंकज गायकवाड यांनी सांगितले. याबाबत आता सहनशक्ती संपत आल्याने एका महिन्यापूर्वी शासनाला राजीनाम्याबाबत नोटीस पाठविली होती. मात्र शासनाने याबाबत काहीही दखल न घेतल्याने अखेर आज ८ पैकी ५ कायम सेवेत असणाऱ्या आणि ७ हंगामी सेवेत असलेल्या डॉक्टरांनी राजीनामा दिला आहे.
या राजीनाम्याच्या प्रकारामुळे शासकीय सेवेत काही चांगले करू पाहणाऱ्या डॉक्टर मंडळींच्या खचलेल्या मानासिकतेस जबाबदार कोण, हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. आषाढी यात्रा अगदी तोंडावर आली आहे. मात्र, या राजीनामा सत्रामुळे रुग्णालयातील सेवेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. राजीनामे देण्याबाबत महिनाभरापूर्वी कळवूनही कोणताही निर्णय न घेणारे वरिष्ठ अधिकारी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे.