आजीला चहात विष टाकून संपवलं, मित्रांसोबत कोकणात निघून गेला; 20 वर्षीय नातवाच्या कृत्याने सर्वांनाच धक्का, कारण उघड!

गंगावेश परिसरातील ऋणमुक्तेश्वर मंदिराजवळील शुक्रतारा अपार्टमेंटमध्ये उषा मारुती भिऊंगडे (वय 72) यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (16 फेब्रुवारी) घडली होती. त्यावेळी पोलिसांना नैसर्गिक मृत्यू न वाटता यामागे घातपात असल्याचा संशय होता. या प्रकरणाचा सखोल तपास केल्यानंतर आता आजीच्या नातवाने तिचा खून केला असल्याचं उघड झालं आहे. उषा यांचा चुलत नातू प्रेम परशुराम भिऊंगडे (वय 20) याने चैनीसाठी सोन्याचे दागिने लुटण्याच्या हेतूने विषारी पावडर टाकलेला चहा पाजून खून केल्याचा धक्कादायक प्रकार स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणला. प्रेमला अटक करून दहा तोळे सोन्याचे दागिने जप्त केले असून, त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उषा भिऊंगडे यांचे पती मारुती भिऊंगडे यांचे 30 डिसेंबर 2025 रोजी निधन झाले होते. मूलबाळ नसल्याने त्या गंगावेश येथील शुक्रतारा अपार्टमेंटच्या फ्लॅटमध्ये एकट्याच राहत होत्या. काही दिवसांपासून आजारी असलेल्या उषा यांची देखभाल फुलेवाडी येथील पुतण्या परशुराम भिऊंगडे हे करत होते. रविवारी (15 फेब्रुवारी) रात्री परशुराम हे औषधे देऊन गेले. सोमवारी सकाळी शाहूवाडी तालुक्यात कामानिमित्त गेल्यावर सकाळी 10 वाजताच्या सुमारास उषा यांना त्यांनी फोन केला, पण प्रतिसाद मिळाला नाही. चिंतेतून शेजाऱ्यांना फोन करून घराची चौकशी करण्यास सांगितले. शेजाऱ्यांनी फ्लॅटमध्ये जाऊन बेडरूममध्ये उषा निपचित पडलेल्या आढळल्या.

चैनीसाठी नियोजित विषप्रयोग
महाविद्यालयीन शिक्षणापासून चैनीचे व्यसन लागलेल्या प्रेमला पैशांची गरज होती. वडील परशुराम सोनारकाम करतात. प्रेमने सोन्यात वापरल्या जाणाऱ्या विषारी पावडरचा वापर केला होता. त्याने सोमवारी सकाळी उषा यांच्या फ्लॅटवर जाऊन चहा बनवला, त्यात ती पावडर मिसळली आणि आजीला दिला. नातवावर विश्वास ठेवून आजी तो चहा प्यायल्या. चहा पिताच त्यांना दरदरून घाम आला, शरीर थंड पडले आणि त्या बेशुद्ध झाल्या. आजी मृत झाल्याची खात्री होताच प्रेमने सहा पाटल्या, दोन सोनसाखळ्या, कर्णफुलेसह दहा तोळे दागिने चोरले.

लगेचच कोकणात पळाला..
खून करून प्रेम दुचाकीवरून शिवाजी विद्यापीठात गेला, तिथे मित्रांना भेटला. 11 वाजता परशुराम यांनी फोन करून मृत्यूची बातमी सांगितली. त्यानंतर प्रेम दुपारी फ्लॅटवर आला, अर्धा तास थांबून पोलिसांच्या भीतीने हळूच त्यानं तिथून पळ काढला. फोन स्विच ऑफ करून कपडे बॅगेत भरले, कोकणात मित्रांसोबत जाणार असे सांगून बाहेर पडला. मात्र 19 फेब्रुवारीला घरी परतल्यावर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहायक निरीक्षक सागर वाघ, रूपेश माने, अमित सर्जे, अरविंद पाटील, हंबीरराव अत्रे, राजेश राठोड, सागर चौगले यांच्या तपास पथकाने हा खुनाचा छडा लावला आहे. दरम्यान मुलाच्या गुन्ह्याने वडीलांना मानसिक धक्का बसला आहे. तर या प्रकरणाने कोल्हापूर शहरात खळबळ उडाली असून, व्यसनग्रस्त तरुणांच्या वाढत्या गुन्ह्यांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *