परभणीच्या महापौरपदी ठाकरेसेनेचे इकबाल सय्यद, काँग्रेसच्या साथीने सत्ता, भाजप उमेदवाराचा पराभव

परभणी महानगरपालिकेच्या महापौर पदाची निवडणूक आज संपन्न झाली. या निवडणुकीमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार इकबाल सय्यद विजयी झाले आहेत. मतदानामध्ये इकबाल सय्यद यांना 65 पैकी 39 मते मिळाली असून त्यांच्या विरोधात भाजपच्या तिरूमला खिलारे यांना 26 मते मिळाली आहेत. तेरा मतांनी विजय मिळवत इकबाल सय्यद परभणीच्या महापौरपदी विराजमान झाले आहेत.

चंद्रपूर सारखं परभणीमध्ये देखील भाजपकडून फोडाफोडीचा राजकारण करण्यात आलं होतं, पण याला मात्र महाविकास आघाडीने कसल्याही प्रकारचा थारा दिला नाही. काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शेवटपर्यंत एकत्र राहिले आणि त्याचाच परिणाम होऊन परभणी महापालिकेत पहिल्यांदाच शिवसेनेचा महापौर विराजमान झाला आहे. राज्यामध्ये उद्धव ठाकरे यांना अपयश आलं तरी परभणीत मात्र उद्धव ठाकरेंचा महापौर बसल्याने पुन्हा एकदा परभणी जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचे सिद्ध केले आहे.

परभणी शहर महानगरपालिकेच्या निवडणुका संपन्न झाल्यानंतर 65 पैकी तब्बल 25 जागा जिंकून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. त्या पाठोपाठ काँग्रेस 12, भारतीय जनता पक्ष 12, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार 11 आणि जनसुराज्य पक्ष तीन, यशवंत सेना एक आणि अपक्ष एक असे 65 नगरसेवक या महापालिकेत निवडून आले होते. निवडणुकीपूर्वीच काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने युती करून परभणी शहर महानगरपालिकेची निवडणूक लढवली होती आणि तब्बल आघाडीने 37 जागा जिंकून बहुमत सिद्ध केले होते. 65 सदस्य असलेल्या या सभागृहात 33 हा बहुमताचा आकडा हा शिवसेना आणि काँग्रेसने ओलांडला होता आणि त्यांचाच महापौर उपमहापौर बसेल हे मात्र आधीच ठरले होते.

पण चंद्रपूरमध्ये काँग्रेसचे मोठ्या संख्येने नगरसेवक निवडून आल्यानंतर देखील महापौर पद मिळू न शकल्यामुळे परभणीतही भाजप काहीतरी प्रयोग करील अशी अपेक्षा होती आणि त्यामुळेच कालपासून परभणी महापालिका कोणाच्या ताब्यात जाणार याची उत्सुकता संपूर्ण राज्याला लागली होती. आज महापौर पदाची निवड संपन्न झाली. महापौर पदासाठी तब्बल 14 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते त्यापैकी बारा जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले

शिवसेना आणि काँग्रेसकडून इकबाल सय्यद तर भाजपकडून तिरूमला खिल्लारे या दोघांचेच उमेदवारी अर्ज राहिले आणि या दोघांमध्ये लढत झाली. तिरूमला खिल्लारे यांना भाजपसोबत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि जनसुराज्य पक्षाची एकूण 26 मते मिळाली त्यानंतर शिवसेनेचे उमेदवार इकबाल सय्यद यांना काँग्रेस आणि शिवसेनेची मिळून 38 मते आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अक्षय देशमुख यांचे एक मत मिळाल्याने सय्यद इकबाल यांना तब्बल 39 मध्ये पडली आणि त्यांनी तिरूमला खिल्लारे यांचा 13 मतांनी पराभव केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *