वाहनात बिघाड झाल्यानं रस्त्याच्या कडेला थांबले, तिथेच काळ आडवा, भरधाव ट्रकने चिरडलं; दाम्पत्यासह तिघांचा अंत

वाहनात बिघाड झाल्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या चौघांना अज्ञात वाहनाने धडक दिली. या भीषण अपघातात एका दाम्पत्यासह तिघांचा जागीच मृत्यू तर एक गंभीर जखमी झाला. दिवाळीच्या दिवशी म्हणजे काल मंगळवारी रात्री उशिरा राष्ट्रीय महामार्गावरील बोरगाव मंजू परिसरातील पैलपाडा गावाजवळ हा भीषण अपघात घडला.

बोरगाव मंजू येथील धीरज शाळीग्राम सिरसाठ (वय 35) आणि त्यांची पत्नी अश्विनी (वय 30) हे दोघेही दुकानाचे सामान घेऊन ‘छोटा हत्ती’ने मंगळवारी रात्री कारंजा तालुक्यातील खेर्डा येथे जात होते. पैलपाडा गावाजवळ त्यांच्या वाहनात बिघाड झाल्याने गावाकडे परत जाण्यासाठी त्यांनी दुसरे वाहन बोलविले. आरिफ खान अहमद खान (वय 28) व अन्वर खान अब्दुल खान (वय 25) हे दोघेही तातडीने वाहन घेऊन पैलपाडा गावाजवळ पोहोचले. यानंतर चौघेही नादुरुस्त वाहनाची पाहणी करीत रस्त्याच्या कडेला उभे असताना मूर्तिजापूरकडून बोरगाव मंजूकडे जाणाऱ्या एका मालवाहू वाहनाने त्यांना धडक दिली.

या भीषण अपघातात धीरज, अश्विनी व आरिफ खान यांचा जागीच मृत्यू तर अन्वर खान हे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच बोरगाव मंजू पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले. जखमीला शासकीय रुग्णालयात दाखल केले. अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून महामार्गावरील सीसीटीव्हींच्या मदतीने आरोपीचा शोध सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *