शिक्षण 7वी पास, काम भिशी चालवणे आणि घोटाळा 3 कोटींचा हा कारनामा आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील एक महिला व तिच्या मुलाचा. पण स्कॅम मात्र कोटींचा केला. दोन्ही मायलेकांनी शहरातील 16 हून अधिक सधन नागरिकांना तब्बल 2 कोटी 99 लाख रुपयांचा गंडा घातला आहे. मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, या हायप्रोफाईल फसवणुकीची सध्या शहरात चांगलीच चर्चा आहे.
लोकांचा विश्वास संपादन केला
नंदाबाई रमेश अधुडे (वय 45) आणि मुलगा सौरभ रमेश अधुडे (वय 22, दोघे रा. व्यंकटेश पार्क, बीड बायपास) असं आरोपींचं नाव आहे. तर जयश्री गजानन गिरी (रा. मुकुंदवाडी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. याप्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, मुळची जालना जिल्ह्यातील असलेली नंदाबाई आधुडे या महिलेनं 2014 पासून शहरात भिशी चालवण्यास सुरुवात केली होती. सुरुवातीला छोट्या रकमा वेळेवर परत करून तिने लोकांचा विश्वास संपादन केला. मात्र, हा विश्वास म्हणजे एका मोठ्या आर्थिक सापळ्याची तयारी होती. सातवी पास असूनही तिने ज्या पद्धतीने कोट्यावधींचे व्यवहार हाताळले, ते पाहून पोलीसही चक्रावून गेले आहेत.
कष्टाचा पैसा बंगल्यात आणि मंदिरात…
गुंतवणूकदारांच्या घामाच्या पैशातून या महिलेने स्वतःचे आयुष्य ऐशो-आरामात व्यतीत केले. लोकांच्या पैशातून नंदाबाईने शहरात 70 लाखांचा भव्य बंगला बांधला. तसेच शहरात 3 ते 4 विविधठिकाणी तिने मालमत्ता खरेदी केल्याचं उघड झालं आहे. स्वतःच्या मुळ गावी शेती खरेदी करून तिथे मंदिरही बांधलं आहे.
पैसे मागताच उलट पोलिसांची भीती…
जेव्हा जयश्री गिरी, सपना मरकड 50 लाख आणि मीरा फलके 50 लाख यांच्यासारख्या गुंतवणूकदारांनी मुदत संपल्यावर आपले पैसे मागितले, तेव्हा नंदाबाई आणि तिचा मुलगा सौरभ यांनी त्यांना दाद दिली नाही. उलट, पैसे मागणाऱ्यांनाच पोलिसांत खोट्या तक्रारी करण्याची धमकी देऊन या माय-लेकानं दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अखेर पीडितांनी मुकुंदवाडी पोलिसांत धाव घेतली आणि या 3 कोटींच्या घोटाळ्याचा पर्दाफाश झाला. पोलीस आता या माय-लेकाच्या मालमत्तेचा आणि इतर गुंतवणुकीचा सखोल तपास करत आहेत.
