‘आपलं आडनाव सारखं, तरीही…’; प्रेमविवाहाचा भावाला राग, हॉटेलमध्ये जेवायला बोलावून केला कांड, बहिणीसमोर पतीला संपवलं

प्रेमसंबंधातून झालेल्या बहिणीच्या लग्नाचा राग मनात धरून बहिणीला व तिच्या पतीला पांगरी (ता. बार्शी) गावाजवळील हॉटेलमध्ये जेवायला बोलावले. तेथे दारू पिताना झालेल्या बाचाबाचीतून दारूची काचेची बाटली फोडून बहिणीच्या पतीवर गळ्यावर वार करून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना बुधवारी 28 जानेवारी रात्री आठच्या सुमारास घडली. सैराटप्रमाणेच ऑनर किलिंगचा हा प्रकार असल्याचं मानलं जात आहे. कुटुंबाच्या विरोधात जाऊन प्रेमसंबंधातून झालेल्या विवाहाचा राग धरुन भावाने हॉटेलमध्येच मद्यप्राशन करताना नशेतच बहिणीच्या समोर दारुची बाटली फोडली अन् पतीचा गळा चिरला. बहिणीच्या पतीने दवाखान्यात अखेरचा श्वास घेतला. रागाच्याभरात केलेल्या या कृत्यानं सख्ख्या बहिणीचं कुंकू पुसलं गेलं आहे. या घटनेनं बार्शी तालुक्यासह ,सोलापूर जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. वैजिनाथ बंकट क्षीरसागर (वय 26, रा. अरणगाव, ता. बार्शी) यांनी पांगरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी संशयीत आरोपीला अटक केली असून सध्या तो पोलिसांच्या ताब्यात आहे.

पोलीस डायरीत नोंद झालेल्या नोंदीनुसार

सुशील व रेश्मा यांचा प्रेमविवाह झाला होता. मात्र, या विवाहाला रेश्माच्या कुटुंबीयांचा विरोध होता. सुशील व त्याची पत्नी रेश्मा हे दोघे कामानिमित्त पुणे येथे वास्तव्यास होते. सुशील हा वाहनचालकाचे काम करत होता तर, रेश्मा ही पुण्यातील एका खासगी दवाखान्यात काम करत होती. वर्षभरापूर्वी दोघांनी कुटुंबाच्या विरोधात जाऊन लग्न केले होते. सुशीलच्या मावशीच्या कार्यक्रमानिमित्त दोघे येडेश्वरी येथे आले होते. त्यानंतर ते उक्कडगाव येथे सासू व सासऱ्याकडे गेले होते.

मेव्हणा हॉटेलमध्ये जेवायला घेऊन गेला

संशयीत आरोपी आरोपी ऋषिकेश याने 28 जानेवारी बुधवारी रोजी रात्री ‘आपण सर्वजण हॉटेलवर जेवायला जाऊ’, असं सांगितलं. सुशील, पत्नी रेश्मा, रेश्माचा भाऊ ऋषिकेश, त्याची मैत्रीण काजल सुरज मिसाळ (रा. पुणे) व मामा मच्छिंद्र भीमा चव्हाण हे सर्वजण पांगरी येथील हॉटेल शिवनेरीत जेवणासाठी गेले होते. जेवणाच्यावेळी रेश्मा हिच्या विवाहाच्या कारणावरून ‘आपल्या दोघांचीही आडनावे एकच असून, हे लग्न कसे केले’, असे आरोपी ऋषीकेशने म्हटल्यानंतर बहीण रेश्मा ‘आमचे प्रेमसंबंधातून लग्न झालेले आहे, तू त्यांना काही बोलू नकोस’, असे म्हणाली. यावरून सुशील व ऋषिकेश यांच्यात वाद झाला.

सुशील आणि ऋषीकेचा वाद विकोपाला, अन्…

रेश्माच्या लग्नावरून ऋषीकेशने जाणूनबुजून वादाला सुरुवात केली. वाद विकोपाला गेला आणि ऋषिकेशने हातातील दारूची बाटली फोडून सुशीलच्या गळ्यावर वार केला. या हल्ल्यात सुशील गंभीर जखमी झाला व त्याच्या गळ्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाला. हॉटेल मालक अण्णा घावटे यांनी जखमी सुशीलला खासगी वाहनाने ग्रामीण रुग्णालय, पांगरी येथे दाखल केले. तेथून पुढील उपचारासाठी त्याला जगदाळेमामा हॉस्पिटल, बार्शी येथे हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *