पुण्यातील हायप्रोफाईल शाळेत राडा, पालक म्हणाले 60 हजार फी देऊन…; शिक्षकांची वेगळीच अडचण

पुण्यातील सिंहगड संस्थेच्या हायप्रोफाइल शाळेत गेल्या 16 महिन्यांपासून शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांना पगार मिळालेला नाही. यामुळे त्यांच्यात असंतोष निर्माण झालाय. ‘ही व्यवस्थापनाची मोठी चूक आहे. जर शिक्षकच खुश नसतील तर ते विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण कसे देऊ शकतील?’ असा प्रश्न विचारला जातोय. पालक दरवर्षी 60 हजार रुपये फी भरतात, तरीही शाळा योग्य प्रकारे चालत नाही. यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. पालकांनी याबाबत शाळेच्या मुख्याध्यापकाशी बोलून सखोल चौकशी केली पाहिजे, अशी मागणीही शिक्षक करतायत.

विद्यार्थ्यांना अडचणी

शाळेत शिक्षक दर सहा महिन्यांनी बदलतात. ज्यामुळे मुलांना नवीन शिक्षकांसोबत जुळवून घेण्यात त्रास होतो. हे बदल होण्याचे मुख्य कारण म्हणजे पगार न मिळाल्याने जुने शिक्षक नोकरी सोडतात आणि नवीन येतात. अशा परिस्थितीत मुलांच्या अभ्यासावर विपरीत परिणाम होतो. त्यांना सातत्यपूर्ण मार्गदर्शन मिळत नाही, ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. पालक आणि विद्यार्थी यात काही दोषी नाहीत, ही पूर्णपणे शाळा व्यवस्थापनाची जबाबदारी आहे. यामुळे मुलांचे भविष्य धोक्यात आलय.

पालकांना टाळाटाळीचं उत्तर 

याआधी अनेकदा पालकांनी शाळेतील पर्यवेक्षकांकडे या समस्येबाबत विचारणा केली, पण प्रत्येक वेळी त्यांना अस्पष्ट आणि टाळाटाळ करणारी उत्तरे मिळाली. शाळा प्रशासन समस्या सोडवण्यात गंभीर नाही. पालकांनी मोठी फी भरूनही त्यांच्या मुलांना चांगली सेवा मिळत नसल्याचा आरोप करण्यात आलाय. यामुळे त्यांच्यात राग आणि असंतोष वाढतोय.

कर्मचाऱ्यांचे आंदोलन

पुन्हा एकदा सिंहगड शाळेतील कर्मचाऱ्यांना पगार थकल्याने बस चालक आणि सफाई कर्मचारी यांनी निदर्शन सुरू केले आहे. यामुळे गेल्या सोमवारपासून शाळा बंद आहे. हे आंदोलन थांबवण्यासाठी व्यवस्थापनाकडून काही हालचाली करणे अपेक्षित आहे. पण तसे होताना दिसत नाही. ज्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांवर त्याचा थेट परिणाम होतोय. मुलांचे वर्ग सुरू होत नाहीत आणि अभ्यासात खंड पडतोय.

पालकांचा संताप आणि फीचा प्रश्न

दरवर्षी 60 हजार रुपये फी भरूनही शाळा का बंद राहते?, असा प्रश्न पालक उपस्थित करत आहेत. ही फी भरूनही मुलांना योग्य शिक्षण आणि सुविधा मिळत नाहीत, ज्यामुळे पालकांमध्ये मोठा असंतोष आहे. संस्था पैसे घेते पण जबाबदारी पार पाडत नाही. यासाठी पालकांनी याबाबत एकजूट दाखवली पाहिजे आणि शाळेच्या व्यवस्थापनावर दबाव आणला पाहिजे, असे मत पालक संघटनांनी व्यक्त केलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *