महाराष्ट्राच्या राजकारणातील एक दिग्गज नाव आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते छगन भुजबळ यांच्यासाठी आजचा दिवस दिलासादायक ठरला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्यावर टांगती तलवार असलेल्या कथित महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) त्यांना मोठा दिलासा दिला आहे. आधी एसीबी आणि आता ईडी, अशा दोन्ही यंत्रणांकडून भुजबळ आता पूर्णपणे निर्दोष मुक्त झाले आहेत.
८५० कोटींचा आरोप आणि २ वर्षांचा तुरुंगवास
दिल्लीतील महाराष्ट्र सदन बांधकामात तब्बल ८५० कोटी रुपयांची अफरातफर झाल्याचा गंभीर आरोप छगन भुजबळ यांच्यावर करण्यात आला होता. या प्रकरणात केवळ राजकीय चर्चाच झाली नाही, तर भुजबळांना दोन वर्षे तुरुंगातही राहावे लागले होते. त्यांच्यासह एकूण १४ जणांची नावे या कथित घोटाळ्यात गुंतलेली होती. मात्र, प्रदीर्घ कायदेशीर प्रक्रियेनंतर आता त्यांच्यावरील सर्व आरोपांना पूर्णविराम मिळाला आहे.
