हापालिका निवडणुकींचे निकाल जाहीर झाले आहेत. आता सध्या निवडणुकीत बाजी मारलेल्या पक्षांमध्ये रस्सीखेच सुरु आहे ती महापौरपदासाठी. आता मोठी घडामोड संभाजीनगरमधून आली आहे. महानगरपालिकेवर पहिल्यांदाच ५७ जागांसह स्पष्ट बहुमत मिळवून कमळ फुलले आहे. पण आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत त्या शहराच्या २३ व्या महापौराच्या खुर्चीकडे. आरक्षण खुल्या प्रवर्गासाठी निघालं असलं तरी, शहराचा नवा कारभारी कोण असेल याचा रिमोट कंट्रोल मात्र ओबीसी नेत्यांच्या हातात आहे.
भाजपमध्ये सध्या महापौरपदासाठी एकापेक्षा एक दिग्गज ८ दावेदार मैदानात आहेत. यामध्ये प्रामुख्याने दोन वेळा नगरसेवक महेश माळवतकर,समीर राजूरकर, राजगौरव वानखेडे,शिवाजी दांडगे, रामेश्वर भादवे,विजय औताडे,सुरेंद्र कुलकर्णी,रेणुकादास वैद्य यांसारख्या आक्रमक चेहऱ्यांची नावे आघाडीवर आहेत. मात्र, भाजपमध्ये नेहमीच धक्कातंत्राचा वापर केला जातो, त्यामुळे चर्चेत नसलेले नाव ऐनवेळी समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ओबीसी कार्ड अन् किंगमेकरची भूमिका…
यावेळच्या महापौर पदाच्या निवडीचं सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, खुल्या प्रवर्गातून महापौर निवडायचा असला तरी भाजपचे वजनदार ओबीसी नेते त्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.
ज्यात बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे ,खासदार डॉ. भागवत कराड आणि आ.संजय केणेकर यांची कोअर कमिटी नावावर शिक्कामोर्तब करणार आहे. जर या तीन नेत्यांमध्ये शहरात एकमत झाले नाही तर अंतिम फैसला थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील.
ओबीसी महापौर देण्याचाही प्लॅन-बी?
पक्षात अशीही चर्चा आहे की, आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ओबीसी समाजाला मोठे प्रतिनिधित्व देण्यासाठी अनिल मकरिये, प्रा. गोविंद केंद्रे किंवा बालाजी मुंडे यांच्यापैकी कुणाला संधी देऊन सर्वांना थक्क केले जाईल का? असा देखील प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेत आहे.शहराच्या विकासाचा केंद्रबिंदू ठरवून भाजप हाय कमांड कोणाच्या गळ्यात विजयाची माळ टाकतं, हे पाहणं रंजक ठरेल.
या शर्यतीत जुन्या जाणत्या अनुभवी चेहऱ्याला संधी मिळते की तरुण रक्ताला प्राधान्य दिलं जातं, याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.
