हळदी सभारंभात जेवण केल्याने 40 ते 50 पाहुण्यांना विषबाधा झाल्याने लग्न रद्द करण्याची वेळ वधूच्या कुटुंबियांवर आली असल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडली आहे. संबंधित केटरर्सवर गुन्हा दाखल करुन त्वरीत अटक करण्याची मागणी कुटुंबियांनी केली आहे.
लग्न रद्द झाल्याने वधूला जबर मानसिक धक्का बसला
विषबाधा झालेल्या लोकांवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. लग्न रद्द झाल्याने वधूला जबर मानसिक धक्का बसला आहे. याप्रकरणी वधूच्या वडिलांनी खडकपाडा पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. केटरर्स राज विलास पराते याच्या विरोधात गुन्हा दाखल करुन त्याच्या तातडीने अटक करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
कल्याण पश्चिमेतील मोहन प्राईड या हाय प्रोफाईल इमारतीत राहणारे संजित बाविस्कर यांच्या मुलगी स्नेहा हिचे आज म्हणजेच रविवारी (18 जानेवारी) लग्न होते. शनिवारी (17 जानेवारी) हळदी सभारंभ होता. हळदी सभारंभ जोरात सुरु होता. दुसरीकडे, नातेवाईक जेवण करीत होते. हळदी सभारंभ पार पडला. पाहुण्यांकरिता ज्या ठिकाणी राहण्यासाठी व्यवस्था केली होती. त्या ठिकाणी ते पाेहोचले. मात्र, रात्री त्यांना उलट्या आणि जुलाब सुरु झाले. हळदी सभारंभातील जेवणातून त्यांना विषबाधा झाली होती.
केटरर्सवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे
विषबाधा झालेल्या काही लोकाना अंबरनाथ, मुरबाड आणि कल्याणच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले. केटरर्सच्या काही लोकांना देखील विषबाधा झाली. धक्कादायक म्हणजे वधू मुलगी स्नेहा हिच्या तिची आई रेखा आणि बहिणीलाही विषबाधा झाली आहे. वधूला या घटनेचा जबर मानसिक धक्का बसल्याने आजचे लग्न रद्द करण्याची वेळ बाविस्कर कुटुंबियांवर आली आहे. वधूचे वडिल संजित बाविस्कर यांनी खडकपाडा पोलिस ठाण्यात धाव घेतली आहे. केटरर्स विरोधात गुन्हा दाखल करुन पोलिसांनी त्याला लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी केली आहे. या घटनेमुळे कल्याममध्ये एकच खळबळ उडाली आहे.
