10 मिनिटाला लोकल, एक्सप्रेस गाड्या, प्रवाशांची सतत वर्दळ; पण मुंबईतील रेल्वे टर्मिनसवर 6 महिन्यांपासून…

पश्चिम रेल्वेवरील सर्वाधिक वर्दळीच्या आणि महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मुंबई सेंट्रल टर्मिनसमधील बॅग स्कॅनर मशीन गेल्या सहा महिन्यांहून अधिक काळ बंद आहे. तसेच, मशीनअभावी पार्सल तपासणीही होत नाही, अशी धक्कादायक बाब माहिती अधिकारातून समोर आली आहे.

लांब पल्ल्याच्या प्रवाशांसाठी महत्त्वाचं

शहरातील वर्दळीची रेल्वे स्थानके आणि टर्मिनस सुरक्षेच्या दृष्टीने नेहमीच संवेदनशील असतात. प्रवासी सुरक्षेसाठी सीसीटीव्हीची व्यवस्था करण्यात येते. लांब पल्ल्याच्या गाडीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी बॅग स्कॅनर मशीन कार्यान्वित असणे गरजेचे आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते समीर झवेरी यांनी मुंबई सेंट्रल येथील बॅग स्कॅनर मशीन आणि पार्सल तपासणी यांची सविस्तर तपशीलवार माहिती मागवली होती. त्यानुसार बॅग स्कॅनर मशीन २७ जुलै २०२४पासून बंद असल्याची माहिती त्यांना मिळाली आहे.

विशेष म्हणजे बॅग स्कॅनर मशीन बंद असल्याबाबत मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक एच. टी. कुंभार यांनी पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना पत्र लिहून याबाबत माहिती दिली. मात्र पत्रव्यवहारानंतरही पश्चिम रेल्वेकडून अद्याप मशीन कार्यान्वित करण्याबाबत कोणत्याही प्रकारची पावले टाकण्यात आलेली नाहीत.

सुरक्षेला मोठा धोका

संभाव्य घातपात, संशयास्पद वस्तू किंवा प्रवासी सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या घटनांची शक्यता लक्षात घेता, बॅग स्कॅनर मशीन बंद असणे अत्यंत धोकादायक असल्याचे रेल्वे पोलिसांनी पत्रात स्पष्टपणे नमूद केले आहे. मुंबई सेंट्रल टर्मिनस तसेच, दादर रेल्वे स्थानकातील पार्सल विभागांमध्ये येणाऱ्या पार्सलची तपासणी करण्यासाठी आवश्यक असलेली पार्सल स्कॅनर मशीनही कार्यरत असणे गरजेचे असल्याचे रेल्वे पोलिसांनी अधोरेखित केले आहे.

मुंबई सेंट्रल टर्मिनसमधून संपूर्ण देशात रेल्वेगाड्यांची ये-जा होते. प्रवाशांसह पार्सल वाहतूकही मोठ्या प्रमाणात येते. यासाठी बॅग स्कॅनर आणि पार्सल तपासणी होणे गरजेचे आहे. प्रत्यक्षात अनेक महिन्यांपासून सुविधा बंद असल्याने रेल्वे स्थानकात सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *