देशभरात सध्या अग्निवीर हा विषय चर्चेत आहे. अग्नीवीर योजनेमुळे लाखो तरुणांना रोजगार मिळाल्याचा दावा केंद्र सरकार करतंय. तर यातून तरुणांच्या सुरक्षा, भविष्याचा विचार केला जात नसल्याचा आरोप विरोधक करतायत. अग्निपथ योजनेअंतर्गत अग्निवीरांची भरती करताना कोणत्या गोष्टी ध्यानात घेतल्या जातात? अग्नीवीरांना काय फायदा मिळतो?
नवीन करियरची संधी
17.5 ते 21 वर्षे वयाच्या दरम्यान होते. काही विशेष प्रकरणांत 23 वर्षांपर्यंत आहे. 4 वर्षांच्या सेवेनंतर ते साधारणतः 21 ते 25 वर्षांच्या वयात निवृत्त होतात. या वयात ते ताजेतवाने आणि ऊर्जावान असतात. ज्यामुळे नवीन करिअर सुरू करण्यासाठी उत्तम संधी मिळते. हे तरुण वय त्यांना व्यवसाय किंवा शिक्षणाकडे वळण्यास मदत करते, ज्याने ते समाजात योगदान देत राहतात. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
आर्थिक मदत
सेवानिवृत्तीच्या वेळी अग्निवीरांना करमुक्त सेवा निधी म्हणून सुमारे 11.71 लाख रुपये मिळतात. ज्यात व्याजाचा समावेश असतो. हा पैसा ते नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा उच्च शिक्षण घेण्यासाठी वापरू शकतात. यामुळे त्यांना आर्थिक स्थिरता मिळते आणि भविष्यातील योजना साकारण्यासाठी आधार मिळतो, ज्याने ते स्वावलंबी होतात.
कौशल्य प्रमाणपत्र आणि शिक्षणाच्या संधी
प्रत्येक अग्निवीराला सेवामुक्तीच्या वेळी अग्निवीर कौशल्य प्रमाणपत्र दिले जाते, जे तांत्रिक ज्ञान आणि नेतृत्व गुणांचे प्रमाणीकरण करते. जे 10वी उत्तीर्ण होऊन आले असतील, त्यांच्यासाठी हे प्रमाणपत्र 12वीच्या समकक्ष असते. तसेच, शिक्षण मंत्रालयाकडून विशेष तीन वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमाची व्यवस्था आहे, ज्यात सेवाकाळाचे क्रेडिट मिळते. हे शिक्षण त्यांना पुढील करिअरसाठी तयार करते.
नोकरीनंतर काय?
माजी अग्निवीरांसाठी केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (सीएपीएफ) आणि असम रायफल्समध्ये 10% जागा आरक्षित आहेत. यामुळे त्यांना सरकारी नोकऱ्यांमध्ये प्राधान्य मिळते आणि सैन्यातील अनुभवाचा फायदा होतो. हे आरक्षण त्यांच्या कौशल्यांचा योग्य उपयोग करण्यासाठी मदत करते. उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान आणि मध्य प्रदेशसारख्या राज्यांत अग्निवीरांना पोलिस भरतीत प्राधान्य दिले जाते. संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये (पीएसयू) देखील त्यांना विशेष महत्व मिळते. हे फायदे त्यांना विविध सरकारी क्षेत्रांत नोकरी मिळवण्यास सुलभ करतात.
सद्यस्थिती काय?
अग्निवीरांना पारंपरिक ‘माजी सैनिक’ दर्जा किंवा पेन्शन मिळत नाही, पण बँकिंग क्षेत्रात कमी व्याजाचे कर्ज, सुरक्षा एजन्सींमध्ये उच्च पदे आणि कॉर्पोरेट जगात प्राधान्य मिळते. त्यामुळे सैन्यातील शिस्त आणि कौशल्यांचा फायदा घेऊन ते विविध क्षेत्रांत यशस्वी होऊ शकतात, असा विश्वास व्यक्त केला जातोय.
