लोणावळा-खंडाळा घाट न चढता थेट पुण्याला पोहोचता येणार, अर्धा तास वाचणार, 14 किमी मार्गावरुन वेगवान प्रवास

मुंबई – पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक कोंडीने मागील अनेक वर्ष प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला होता. मात्र आता प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. बहुप्रतिक्षित ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प जवळपास पूर्ण झाला असून, येत्या काही महिन्यांत हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होणार आहे.

सध्या लोणावळा – खंडाळा घाटावरील प्रवास काही वेळा कंटाळवाणा आणि धोकादायक ठरतो. मात्र, 14 किमी लांबीचा हा मिसिंग लिंक सुरू झाल्यानंतर प्रवाशांना घाटातील वळणातून जात वेळ आणि ऊर्जा खर्च करण्याची गरज नाही. प्रवासाचे अंतर 6 किमीने कमी होणार असून जवळपास 25 ते 30 मिनिटं इतकी वेळेची बचत होईल, हा प्रवाशांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.

या प्रकल्पात अभियांत्रिकीचा खास चमत्कार करण्यात आला आहे. सह्याद्रीच्या डोंगर-रांगामध्ये उभारलेला 180 मीटर उंच Keel-Stayed ब्रिज आणि दोन भव्य बोगदे तयार आहेत. यामुळे मुंबई – पुणे प्रवास सुरक्षित आणि वेगवान होईल. बोगद्यांचं काम सध्या 98 टक्के पूर्ण झालं असून, शेवटचा अखेरचा टप्पा शिल्लक आहे. मुख्य बोगदा 8.87 किमी, तर दुसरा 1.67 किमी लांब आहे.

MSRDC च्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, हा प्रकल्प 1 मे 2026 रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त वाहतुकीसाठी खुला होऊ शकतो. प्रकल्पाचा अंदाजित खर्च 6,695 कोटी रुपये असून, हा घाटातील अपघातप्रवण मार्ग टाळून प्रवाशांसाठी नव्या प्रवासाचा अनुभव निर्माण करणार आहे. या प्रकल्पामुळे लोणावळ्यात प्रवेश करणे गरजेचे असेल तरच जुना घाट वापरावा लागेल, अन्यथा प्रवास थेट, वेगवान आणि आरामदायक होईल. त्यामुळे प्रवाशांसाठी घाटाची तणावपूर्ण वेळ संपणार आहे आणि प्रवास आता अधिक सुरक्षित व सोयीस्कर होणार आहे.

दरम्यान, मुंबई – पुणे प्रवाशांसाठी ही प्रकल्प पूर्णत्वाची मोठी सुखद बातमी असून, वाहतूक कोंडीची समस्या आता कायमची दूर होण्याची अपेक्षा आहे. प्रवास सोपा, जलद आणि सुरक्षित हीच ‘मिसिंग लिंक’ची खरी ताकद आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *