पुण्यात पैशांचा पाऊस! निवडणुकीत एक उमेदवार किती खर्च करतोय? आकडा वाचून चक्रावून जाल

महापालिका निवडणुकीत पहिल्यांदाच उतरलेल्या गावकऱ्यांकडून ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे. या गाम्रस्थांना शहरातील उमेदवारांची जोड मिळाली आहे. निवडणुकीपूर्वीच सर्व्हेमध्ये येण्यासाठी या उमेदवारांनी बक्कळ खर्च केला असला तरी निवडणुकीसाठी १५ ते २० कोटी रुपयांची तजवीज करून ठेवली आहे. एका प्रभागात प्रमुख पक्षांचे चार-चार उमेदवार आहेत. प्रमुख प्रतिस्पर्धी असलेल्या आठ उमेदवारांनी प्रत्येकी १५ कोटी रुपये खर्च केले तर हा आकडा १२० कोटी रुपयांपर्यंत पोहोचणार आहे. या चार प्रभागांतील कार्यकर्ते मालामाल झाले असून, वस्ती भागात पैसे वाटल्याच्या आरोपांवरून हाणामारीच्या घटनाही घडत आहेत.

महापालिका निवडणुकीच्या लढती रंगतदार अवस्थेत आल्या असून, मोठ्या नेत्यांच्या सभांनी वातावरणात रंग भरण्यास सुरुवात केली आहे. पुणे शहराच्या उपनगरांमधील लढती तर अत्यंत चुरशीच्या होण्याचे चित्र दिसत असून, प्रत्येक प्रभागात किमान १०० कोटी रुपयांची उलाढाल होईल, असे जाणकरांचे म्हणणे आहे.

पुणे महापालिकेत २०१७ आणि २०२१ला ३२ गावांचा समावेश करण्यात आला आहे. या गावांना महापालिकेच्या जुन्या प्रभागांना जोडून प्रभाग तयार करण्यात आले आहेत. अशा चार प्रभागांमधील मालदार उमेदवारांनी निवडणुकीचे गणितच बदलले असून, प्रत्येकी १५ कोटी रुपयांपर्यंत खर्च करण्याच्या आणाभाका खाल्ल्या आहेत. त्यामुळे प्रमुख दोन पॅनेलमध्ये प्रत्येकी ६० कोटी रुपये अशा १२० कोटी रुपयांपर्यंत खर्चाचे गणित आखण्यात आल्याने यंत्रणाही चक्रावून गेल्या आहेत. महापालिकेच्या आचारसंहितेचे धिंडवडे या प्रभागांमध्ये दररोज निघत असून, पैशांचा पाऊस पडत असल्याच्या चर्चा खासगीत रंगल्या आहेत.

पश्चिम पुण्यातील सूस-बाणेर-पाषाण या प्रभागात पैसे वाटल्याच्या आरोपातून एक गुन्हा दाखल झाला आहे, तर शुक्रवारी पुन्हा या प्रभागात पैसे वाटल्याच्या आरोपावरून गोंधळ झाला.

कार्यकर्त्यांची चंगळ

हडपसर, वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघांतील प्रभागांमध्ये सध्या पैशांचा पाऊस पडतो आहे. कार्यकर्त्यांची चंगळ असून, मतदारांनाही आकर्षित करण्यासाठी वेगवेगळी प्रलोभने दाखविण्यात येत आहेत. महापालिका प्रशासनाकडून या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवण्यात येत असले तरी उमेदवारांकडून प्रशासनाला चकवा देऊन सर्व उद्योग सुरू ठेवण्यात आले आहेत. मतदानापूर्वीच्या ४८ तासांत या प्रभागांमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने पुरेशी खबरदारी घेण्याची मागणी करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *