उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढला असून याचा परिणाम महाराष्ट्रात दिसतो आहे. राज्यातील हवामानात सतत चढ-उतार होताना दिसत आहेत. राज्यातील किमान तापमानात वाढ झाली असून थंडीचा कडाका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. अनेक शहरातील तापमानाचा पारा 10 अंशाहून खाली गेला आहे. त्यामुळे गारठा कायम राहणार आहे.
राज्यातील परभणी, धुळे, निफाड या शहरात तापमानाचा पारा मोठ्या प्रमाणात घसरला आहे. परभणीत तापमान 6.8, धुळ्यात 7 अंश सेल्सिअस, तर अहिल्यानगरमध्ये 7.5 आणि निफाडमध्ये 7.6 असा तापमानाचा पारा नोंदवण्यात आला आहे. तर राज्यातील सर्वाधिक निचांकी तापमानाचा पारा जवळपास 7 ते 8 अंशादरम्यान असेल. राज्यात सर्वाधिक थंडीचं प्रमाण उत्तर महाराष्ट्रात असेल. तिथे कडाक्याची थंडी असेल. राज्यभरात थंडीची स्थिती पुढील चार दिवस अशीच राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.
महाराष्ट्रातील अनेक भागात थंडीची लाट नसली तरी तापमानाचा पारा मात्र खाली गेला आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये सकाळी, पहाटेच्या वेळी आणि रात्रीच्या वेळी किमान तापमानात घट होते. हवेत गारवा निर्माण होतो आणि थंड वारे वाहतात. मात्र मुंबईसारख्या शहरात दुपारनंतर उकाडा जाणवतो आहे. किनारपट्टी भागातही हीच स्थिती आहे. कोकणातही दुपारनंतर उकाडा जाणवतो आहे.
राज्यात मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. राज्यात थंडीची लाट नसली, तरी गारवा मात्र असेल. अनेक भागांत धुक्याची चादर पसरली असून यामुळे दृश्यमानतेवर परिणाम होत आहे. वाहनचालकांनी वाहन चालवताना काळजी घेण्याचा सल्लाही हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
