धोका वाढला! कडाक्याच्या थंडीत पावसाची शक्यता; महाराष्ट्रासह भारतात चिंतातूर करणारं हवामान

उत्तर भारतातील पर्वतीय राज्यांमध्ये हवामानात होणाऱ्या बदलांमुळं महाराष्ट्र आणि दक्षिण भारतापर्यंत कमाल आणि किमान तापमानाच घट दिसून येत आहे. मागील 24 तासांचा आढावा घेतल्यास राज्यात मराठवाडा आणि विदर्भासह घाटमाथ्यावरही थंड वाऱ्यांनी हिवाळा आणखी तीव्र होत चालल्याटची जाणीव करून गिली. त्यातच आता पुढील 24 तासांमध्ये महाराष्ट्रात तापमानात काही अंशी तापमानात चढ- उतार होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.

हवामान विभागाच्या पूर्वानुमानानुसार राज्यात पुढील 24 तासांमध्ये उत्तर महाराष्ट्रात तुलनेनं तापमानात अधिक घसरण होणार असून, किमान तापमानाचा आकडा एक अंकी दिसून येईल. धुळे, निफाड, अहिल्यानगर इथं पारा 5 ते 8 अंशांदरम्यान असेल. राज्यात थंडीची लाट सक्रिय नसली तरीही उत्तरेकडे सक्रिय असणाऱ्या शीतलहरींचाही परिणाम मध्य भारतासह महाराष्ट्रावरही परिणाम होताना दिसत आहे. ज्यामुळं पुढील 48 तासांमध्ये किमान तापमानात 2 ते 3 अंशांची घट होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. ज्यामुळं मुंबई, रायगड, पालघरसह ठाण्यात दिवसा ऊन आणि सायंकाळनंतर किमान तापमानात घट होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

देशभरातील हवामानातही लक्षणीय बदल… 

केंद्रीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये उत्तर पूर्व भारतातील तब्बल 22 शहरांमध्ये दाट धुक्याच्या चादरीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आयएमडीच्या माहितीनुसार बिहार, पटना, गया, पूर्णिया, भागलपूर, खगडिया, बेगूसराय, दरभंगा या भागांसाठी धुक्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू काश्मीर इथं थंडीचा कडाका वाढून हिमालयावरून येणाऱ्या वाऱ्यांमुळं इथं अतीव पर्वतीय भागांमध्ये हिमवृष्टीसह काही भागांत पावसाचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, काश्मीरमध्ये सुरू असणाऱ्या चिल्ला ए कलांमुळं या भागात कडाक्याची थंडी पडणार असल्यानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पर्वतीय भागांमध्ये हिमवृष्टी होणारी वाढ पाहता सध्या दुर्गम भागांमध्ये न जाण्याचा इशारा हवामान विभागाक़डून जारी करण्यात आला आहे.

दाट धुक्यामुळे विमानसेवा ठप्प

दिल्लीसह उत्तर भारतातील दाट धुक्यामुळे मंगळवारी देशभरातून उत्तरेकडे ये- जा करणाऱ्या 500 विमानांना विलंब झाला, तर 14 विमानांचं उड्डाण रद्द करण्यात आलं. याचा सर्वाधिक फटका दिल्लीकडे जाणाऱ्या आणि दिल्लीतून अन्यत्र जाणाऱ्या विमानांना बसला. ज्यामध्ये सर्वाधिक फटका इंडिगो, एअर इंडिया, स्पाईसजेट, अकासा एअर अशा कंपन्यांना बसला. ज्यामुळं विमानप्रवासाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांनी प्रवासाच्या नियोजनासंदर्भात विमानसेवा पुरवणाऱ्या कंपन्यांच्या ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधावा, असं आवाहन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *